Cyclone Nisarga: रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे विजेचा खांब अंगावर कोसळल्याने 58 वर्षीय वक्तीचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट असताना निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड (Raigad) जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. यातच रायगड जिल्ह्यातील अलिबाग (Alibag) येथे विजेचा खांब अंगावर कोसळल्याने एका 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. या घटनेने अलिबाग परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाला आहे. सिंधुदुर्गातही वादळी वारा जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

महाराष्ट्रातील 21 आणि गुजरातच्या 16 जिल्ह्यांमध्ये वादळाचा परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यांत एनडीआरएफने एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. यादरम्यान मुंबईच्या वांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुसरीकडे गुजरातमधील द्वारकेच्या समुद्रात उंट लाटा उसळत आहेत. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवरही धडकणार होते, पण हवामान खात्याने नंतर हा अंदाज मागे घेतला. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनारी आणि संभाव्य धोका असलेल्या मुंबईतील विविध भागांतून आतापर्यंत सुमारे 20 ते 25 हजार नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर सुमारे 30 हजार नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वत: स्थलांतर केले आहे. हे देखील वाचा- Cyclone Nisarga: निसर्ग चक्रीवादळ संकटाचा सामना करणाऱ्या नागरिकांचे मनोधौर्य वाढविण्यासाठी मनसे प्रयत्नशील; दिला 'हा' संदेश

एएनआयचे ट्वीट-

हे वादळ 1 जून रोजी अरबी समुद्राच्या मध्य-पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले, त्यानंतर त्याचे वादळात रुपांतर झाले. हे कमी दाबाचे क्षेत्र मुंबईपासून 630 किमी दक्षिण-पश्चिमेस होते. राज्यातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग भागात दुपारी 1 वाजत हे वादळ धडकण्यास सुरूवात झाली. येथून जाण्यासाठी वादळाला तीन तास लागले.