Cervical Cancer | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कधी-कधी स्त्रीच्या आयुष्यातील काही सगळ्यात कठीण लढायांमधली एक लढाई स्वत:बरोबर सुरू असते – त्या शंका, ते मुकेपण आणि तो स्वत:ला प्राधान्य देताना वाटणारा संकोच हे सारे त्यात येते. टाटा ट्रस्टची सार्वजनिक आरोग्य जागरुकता मोहीम “खुद से जीत” या मुक्या झगड्याची दखल घेते, सर्व्हायकल कॅन्सरची वेळीच तपासणी करून घेण्याची व आपल्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात घेण्याची कळकळीची विनंती महिलांना करते.

सर्व्हायकल कॅन्सर हा भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी जवळजवळ ७५,००० जीव जातात – व हे बहुतेकदा उशीरा निदान झाल्याने घडते. सुरुवातीच्या टप्प्यावर निदान झाल्यास बरे होण्याची मोठी शक्यता असूनही, लवकर निदान झाल्याने हा आजार यशस्वीपणे हाताळला जाण्याचे प्रमाण ९५ टक्‍के असूनही, अनेक स्त्रिया याची तपासणी वेळेवर करून घेत नाहीत. लक्षावधी महिला सर्व्हायकल कॅन्सर व त्याच्या लक्षणांविषयी जागरुकतेचा प्रचंड अभाव असल्याने किंवा भीती, शरमेची भावना आणि अशा बाबतीत मौन बाळगण्याने या विलंबास हातभार लावणाऱ्या गोष्टींमुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करत राहतात.

टाटा ट्रस्टने वर्षानुवर्ष समाजाच्या तळागाळातील घटकांशी साधलेल्या संवादातून – त्याचाच भाग म्हणून गेल्या वर्षी राज्य सरकार व सहयोगी संस्थांच्या साथीने झारखंड, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि महाराष्ट्रात पार पाडलेल्या २६,००० हून अधिक सर्व्हायकल कॅन्सर तपासण्यांमधून या विषयावरील सखोल माहिती उघड केली आहे व मदत उपलब्ध असूनही ती घेण्यापासून स्त्रियांना परावृत्त करणाऱ्या भावनिक आणि सामाजिक अडथळ्यांना लोकांसमोर आणले आहे. आपल्या सार्वजनिक आरोग्य जागरुकता उपक्रमांच्या माध्यमातून स्त्रियांना संकोचाऐवजी कृतीसाठी प्रोत्साहित करणे, हे ट्रस्टचे लक्ष्य आहे.

जागरुकतेची प्रभावी सुरुवात करण्यासाठी टाटा ट्रस्टने एका परिसंवादाचे आयोजन केले, ज्यामध्ये समस्या, स्क्रीनिंगमध्ये येणारे अडसर, प्रमुख उपाययोजना यांचे स्वरूप मांडण्यासाठी व भारतामध्ये सर्व्हायकल कॅन्सरबद्दलच्या चर्चेला नवी दिशा कशी देता येईल, याचा शोध घेण्यासाठी ऑन्कोलॉजी, सायको-ऑन्कोलॉजी आणि रुग्ण आधार या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ एकत्र आले. या सत्रामध्ये सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी, टाटा मेमोरियल सेंटरच्या डेप्युटी डायरेक्टर डॉ. गौरवी मिश्रा, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या सायको-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सविता गोस्वामी व कर्करोगावर मात केलेल्या आणि व्ही केअर फाउंडेशनच्या संस्थापक वंदना गुप्ता यांचा समावेश होता.

या सत्राचे सूत्रसंचालन टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनच्या मेडिकल ऑपरेशन्स विभागच्या प्रमुख डॉ. रुद्रदत्ता श्रोत्रिय यांनी केले. त्या म्हणाल्या, “सर्व्हायकल कॅन्सरचा भारतावरील भार १५ लाख डिसएबिलिटी-अॅडजस्टेड लाइफ इअर्स (DALYs) इतका आहे, ज्याचा सर्वाधिक प्रभाव सर्वात कमी जागरुकता आणि तपासणीच्या सुविधांचा सर्वाधिक अभाव असलेल्या सामाजिक स्तरातल्या ३०-६५ वयोगटातील स्त्रियांवर पडतो. जागरुकतेचे प्रमाण कमी असणे व संकोचाची भावना हीच आजही या सर्वात प्रमुख आव्हाने आहेत: ज्या महिलांना सुरुवातीची लक्षणे अनुभवास येतात, त्या लक्षणांचा सर्व्हायकल कॅन्सरशी संबंध जोडत नाहीत, आणि काहींनी हा संबंध जोडला तरीही शरमेच्या किंवा भीतीच्या भावनेमुळे त्या याबद्दल काही पाऊल उचलण्यास उशीर करतात. अगदी कोणतीही लक्षणे दिसली नाहीत तरीही या आजाराचा धोका असू शकतो या गोष्टीचीही अनेकींना कल्पना नसते, म्हणूनच तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. जागरुकता निर्माण करत सर्व्हायकल कॅन्सरविषयीच्या चर्चेला नवे वळण देण्यासाठी पावले उचलत आम्ही जिथे महिलांच्या ठायी आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठीची सक्षमता येईल अशा एका संस्कृतीची जोपासना करू शकू, अशी आम्हाला आशा आहे.”

याचवेळी टाटा ट्रस्टने एका स्त्रीचा अंतर्गत झगडा आणि स्वत:बद्दलची साशंकता, अस्वीकार व संकोच या भावनांच्या वाटेने जात परिवर्तनाच्या क्षणापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा तिचा प्रवास ठळकपणे मांडणाऱ्या सोशल अवेअरनेस फिल्मचे अनावरण केले, ज्यामध्ये ती आपल्या लक्षणांकडे लक्ष देण्याची निवड करते आणि स्क्रीनिंग करून घेते. अशाप्रकारच्या कथनांना प्रभावीपणे मांडत अधिकाधिक महिलांना आपल्या शरीराचे सांगणे ऐकण्यासाठी व आपल्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करणे हे ट्रस्टचे लक्ष्य आहे.

याविषयी चर्चा करताना टाटा ट्रस्टच्या कम्युनिकेशन स्पेश्यालिस्ट शिल्पी घोष म्हणाल्या, “स्त्रिया – त्यांचे मौन, त्यांची भीती, त्यांचा संकोच यांचा कानोसा घेण्यातून ‘खुद से जीत’चा जन्म झाला. सर्व्हायकल कॅन्सर ही केवळ एक वैद्यकीय समस्या नाही; तर ती एक भावनिक समस्या आहे, जी कुजबुजींमध्ये आणि शक्याशक्यतांच्या कल्पनेमध्ये दडलेली आहे. सोयीसुविधांची उपलब्धता हा एकमेव अडथळा नाही; तर त्यामागे एक शंकेचा सूर असतो, जो महिलांना कृती करू नका, बोलू नका किंवा स्वत:ला प्राधान्य देऊ नका असे सांगत असतो हे आमच्या लक्षात आले. ही मोहीम म्हणजे तिला थोडा धक्का देत जागे करण्याचा - तुम्ही महत्त्वाच्या आहात, तुमचे आरोग्य महत्त्वाचे आहे हे तिला सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक चित्रचौकट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संपर्कबिंदूच्या माध्यमातून आम्हाला तिला ही गोष्ट माहीत करून द्यायची आहे की ही आतली लढाई जिंकणे म्हणजे कदाचित तिच्यासाठी तिच्या तोडीचे आयुष्य मिळविणे असणार आहे.”