राजधानी दिल्लीत 'चौकीदार ही चोर'चा थ्रीलर ; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदींवर हल्ला
राहुल गांधी, काँग्रस अध्यक्ष आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान (Archived, edited, representative images)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा हल्ला चढवत राजधानी दिल्लीत 'चौकीदार ही चोर'चा क्राईम थ्रिलर सुरु असल्याचे म्हटले आहे. राकेश अस्थाना यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची चौकशी करणारे उपमहासंचालक मनीषकुमार के सिन्हा यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमिवर राहुल यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर मंगळवारी (२० नोव्हेंबर) टीका केली आहे. ‘चौकीदार ही चोर’ या क्राइम थ्रिलरमध्ये अधिकारी थकलेत, विश्वासाला तडा गेला आहे आणि लोकशाही रडत आहे, ट्विट राहुल यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एका वृत्ताची लिंकही शेअर केली आहे. या वृत्तात सीबीआय डीआयजी यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख आहे. सीबीआय अधिकारी मनीष कुमार सिन्हा यांनी सोमवारी सर्वोच्च न्ययालयाचा दरवाजा ठोठावला होता आणि आपल्या बदलीच्या आदेशाला आव्हान दिले होते.

२०००च्या बॅचचे आयपीएस अधिकारी मनीष यांनी तीस पानांची याचिका दाखल केली आहे. यात आरोप करण्यात आला आहे की, उद्योगपती मनोज प्रसादने म्हटले होते की, त्याच्या वडिलांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चांगले संबंध आहेत. मनोज प्रसाद यांना गेल्या १६ ऑक्टोबरला सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात अटक केले होते. (हेही वाचा, मोदींनी राफेल डीलवर फक्त 15 मिनिटे माझ्यासोबत चर्चा करावी- राहुल गांधींचे थेट आव्हान)

सिन्हा यांनी पुढे म्हटले आहे की, ते मांस व्यापारी मोईन कुरेशी प्रकरणात सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्ताना यांच्यावर २.९५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोपांची चौकशी करत होते. त्यांनी या प्रकरणात अजित डोवाल यांनी दोन वेळा चौकशी थांबवण्याचे निर्देश दिल्याचाही आरोप केला आहे.

विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध चौकशी करत असलेले मनीष कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, त्यांची बदली ही तपासाची दिशा बदलण्यासाठी आणि राकेश अस्थाना यांना मदत करण्याच्या उद्देशानेच केली आहे.