Bihar Assembly Election 2020: 'भाजपा'चे जवळचे आमने-सामने; बिहार विधानसभा निवडणुकीत NDA समोर नवी आव्हाने?

बिहारमध्ये 243 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडत आहे.ही निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान होईल. त्यासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

Bihar Assembly Election 2020: 'भाजपा'चे जवळचे आमने-सामने; बिहार विधानसभा निवडणुकीत NDA समोर नवी आव्हाने?
Bihar Assembly Election 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election) आजचा दिवस (शनिवार, 3 ऑक्टोबर 2020) राष्ट्रीय लोकशाही आघाडी ( National Democratic Alliance) आणि केंद्र सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. रालोआचा घटक पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने (LJP) आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.या बैठकीत बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Bihar Assembly Election 2020) एनडीए (NDA) घटक पक्ष म्हणून लढवायची की स्वतंत्र लढवायची यावर महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे. एनडीएमधील लोजपाला भाजपसोबत काहीच अडचण नाही. परंतू, लोजपला नितीश कुमार यांच्या जेडीयु बाबत अनेक आक्षेप आहेत. मतभेद वेळीच मिटले नाही तर या निवडणुकीत जेडीयु विरुद्ध लोजपा असा सामना भाजपला पाहावा लागू शकतो. म्हणजे भाजपचे जवळचे आमने-सामने असा विचित्र समना बिहारच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.

'सात निश्चय' या योजना भ्रष्टाचाराचे कोठार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 'सात निश्चय' योजना नुकतीच जाहीर केली. त्याची संभावना लोजपाने भ्रष्टाचाराचे कोठार अशी केली. त्यामुळे लोजपा गेल्या काही काळापासून ज्या पद्धतीने बॅटींग करत आहे ते पाहता या विधानसभा निवडणुकीत लोजपा स्वतंत्र लढणार असे दिसते.

लोजपा 143 जागा लढवणार

लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष बिहार विधानसभेत 143 जागा लढवणार आहे. इतकेच नव्हे तर एनडीएत असलो तरी आपला पक्ष नीतीश कुमार याच्या जदयु आणि जीतन राम मांझी यांच्या हम पक्षाविरोधात निवडणूक लढवणार असल्यचेही चिराग पासवान यांनी सांगितले आहे. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: एनडीएला तडे? चिराग पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष NDA मधून बाहेर पडण्याची शक्यता- सूत्र)

अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक

दरम्यान, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यासोबत काही दिवसांपूर्वीच एक बैठक घेतली. या बैठकीत बिहार विधानसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तोडगा निघू शकला नाही.

'सात निश्चय' योजनेला मानत नाही

लोक जनशक्ती पक्षाने अधिकृतपणे म्हटले आहे की त्यांचा पक्ष नीतीश कुमार यांच्या 'सात निश्चय' योजनेला मानत नाही. लोजपा प्रवक्ते अशरफ अन्सारी यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, नीतीश कुमार यांच्या 'सात निश्चय' योजनेतील सर्व कामे अपूर्ण आहेत. या योजनेत काम केलेल्या लोकांना अद्यापहीत्याचा मोबदला मिळाला नाही, असेही लोजपाने म्हटले आहे.त्यामुळे ही योजना म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरन असल्याचे बिहारच्या जनतेचे मत असल्याचाही लोजपाचा दावा आहे.

भाजपशी वैर नाही पण जदयुला सोडणार नाही

दरम्यान, एका बाजूला भाजपने म्हटले आहे की, लोक जनशक्ती पक्षासोबत आमचे कोणतेही मतभेद नाहीत. दुसऱ्या बाजूला लोजपाने म्हटले आहे की, आम्ही भाजप विरोधात उमेदवार उतरवणार नाही. त्यामुळे भाजप आणि लोजपा मध्ये अलबेल दिसत असले तरी एनडीएचा घटक असलेल्या जदयुबाबत कसा तोडगा निघतो याबाबत उत्सुकता आहे. लोजपा भाजपसोबत उमेदवार न उतरवण्याचे आणखी एक कारण आहे ते म्हणजे चिराग पासवान यांचे वडील आणि लोजपाचे संस्थापक राम विलास पासवान हे केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

बिहारमध्ये 243 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडत आहे.ही निवडणूक 3 टप्प्यात पार पडणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबरला मतदान होईल. त्यासाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2020 04:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).