कृत्रिम बुद्धिमत्ता ही को-पायलट असावी, ऑटोपायलट न्हवे; फिक्की लिजेंड्स सिरीजमध्ये ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. र. अ. माशेलकर यांचे प्रतिपादन
भारताने आगामी काळात जगासाठी परवडणारे, उच्च दर्जाचे आणि कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. जर भारताला 'विकसित भारत २०४७'चे ध्येय गाठायचे असेल, तर डीप-टेक (Deep-Tech), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सर्वसमावेशक नवोपक्रम (Inclusive Innovation) हेच देशाचे सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ ठरतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि सीएसआयआर (CSIR) चे माजी महासंचालक पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अ. माशेलकर यांनी केले.
मुंबईत फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) तर्फे आयोजित 'फिक्की लिजेंड्स सिरीज' अंतर्गत "Winning Through Innovation: Lessons for Industry and Society" या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. या सत्राला उद्योग क्षेत्रातील दिग्गज, धोरणकर्ते, शास्त्रज्ञ आणि नवोदित उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केवळ वापरकर्ते नाही, तर तंत्रज्ञानाचे निर्माते बना!
उद्योगजगताला संबोधित करताना डॉ. माशेलकर म्हणाले की, भारताने आता केवळ पाश्चात्य किंवा जागतिक तंत्रज्ञानाचा वापर करणारा ग्राहक देश म्हणून मर्यादित राहू नये. डीप सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सरकार-उद्योग यांच्यातील भक्कम भागीदारीच्या बळावर भारताने जागतिक दर्जाचे नवोपक्रम निर्माण करणारा देश बनणे गरजेचे आहे.
आपल्या जगप्रसिद्ध "More from Less for More" (कमीत कमी संसाधनांत, अधिकाधिक लोकांपर्यंत, जास्तीत जास्त पोहोचवणे) या तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले, "कमी संसाधनांचा वापर करून जागतिक दर्जाची, दर्जेदार आणि कार्यक्षम उत्पादने अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देणे हीच भारतासमोरील सर्वात मोठी संधी आहे. नवोपक्रमाचे मूल्यांकन केवळ त्याच्या महागड्या स्वरूपावरून न ठरता, त्याने समाजातील किती मोठ्या समस्येचे निराकरण केले, यावरून ठरवले पाहिजे. उत्कृष्टता, परवडणारी किंमत आणि सर्वसमावेशकता ही भारताच्या विकास मॉडेलची त्रिसूत्री असायला हवी."
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2026 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

