Coronavirus: देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
PM Modi addressing the nation on coronavirus situation | (Photo Credits: DD News)

देशातील लॉकडाऊन (Lockdown)  कालावधी 3 मे 2020 पर्यंत वाढविण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी केली आहे.  देशभरातील विविध राज्य सरकारं, विविध क्षेत्रातील लोक, मान्यवर यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचना, सल्ला आणि मागणी या सर्वांचा विचार करुन केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी सांगितले. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 10 वाजता देशातील जनतेशी संवाद साधला. या वेळी ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संयमाने श्रद्धांजली

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले,  कोरोना व्हायरस जागतीक महामारीविरुद्ध भारत मोठ्या धौर्याने लढतो आहे. कोरोना व्हायरस संकटामुळे होणारे नुकसान भारताने मोठ्या प्रमाणावर टाळले आहे. आपला संयम, त्रास आणि अडचण या सर्वांमुळेच देश हे करु शकला.

देशातील नागरिक सैनिकाप्रमाणे लढत आहेत

देशातील नागरिक एका प्रशिक्षित सैनिकाप्रमाणे कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. कोरोना व्हायरस विरुद्ध देशातील जनता देत असलेला लढा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशातील जनतेने संयमाने श्रद्धांजली अर्पण केली, असेही मोदी या वेळी म्हणाले.

घरात राहूण सण साजरे करत देशवासियांनी एकजूट दाखवली

या वेळी बोलताना मोदी म्हणाले, हा काळ भारतातील विविध सण उत्सवाचा आहे. या काळात देशभरात विविध सण उत्सव साजरे केले जातात. देशातील नागरिक ज्या प्रमाणे नियम पाळत आहेत. आपल्या घरात बसून आपले सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करत आहेत. हे सर्व अभिमानास्पद आहे. या सणांच्या निमित्ताने आपणा सर्वांच्या आरोग्यदायी जीवनाबद्दल मंगल कामना, असेही मोदी म्हणाले.

समस्या दिसताच त्यावर तोडगा

भारतात सुरुवातीला कोरोना व्हायरस एकही रुग्ण आढळला नाही. पण, जेव्हा भारतात कोरोनाचा रुग्ण सापडला तेव्हा विदेशातून येणाऱ्या नागरिक, प्रवासी आदींची विमानतळावरच चाचणी घेण्यात आली. भारताने संकट येण्याची वाटच पाहिली नाही. समस्या दिसताच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. जगभरातील देशांचा विचार करता भारत कोरोना संकटात कमी नुकसान झालेला देश आहे, असेही मोदी यांनी मोठ्या उत्साहाने सांगितले.

जगाच्या तुलनेत भारतात कमी नुकसान

भारत कोणाशी तुलना करत नाही. पण, वास्तवही नाकारता येणार नाही. त्यामुळे जगभरातील देशांच्या तुलनेत भारत अधिक चांगल्या स्थिती आहे. जगभरातील अनेक मोठ्या देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या भारताच्या 25% पेक्षाही अधिक आहे. केवळ सोशल डीस्टन्सींग आणि लॉकडाऊनमुळेच देशाला इतका मोठा फायदा होऊ शकला. अत्यंत संकटाच्या काळात भारताने जी पावले उचलली आहेत त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. अत्यंत कमी संसाधनं असतानाही भारताने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये हजारोच्या संख्येने कोरोनाचे बळी आहेत. तुलनेत भारतात हे प्रमाण कमी असणं आनंददाई आहे, असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार असल्याबाबत पंतप्रधान कार्यालयाने कालच माहिती दिली होती. पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल 2020 च्या सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस दरम्यानच्या काळात जनतेशी साधलेला हा तिसरा संवाद आहे. या आधी मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात 19 आणि 24 मार्च 2020 या दिवशी देशाला संबोधित केले होते. 19 मार्च रोजी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरस पासून नियंत्रण मिळविण्यासठी संकल्प आणि संयम राखण्याचे अवाहन केले होते. सोबत, 22 मार्च 2020 (रविवार) या दिवशी 'जनता कर्फ्यू'चे अवाहनही केले होते.