
मागील दोन आठवड्यांपासून विविध आजारांवर झुंज देणार्रे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे (Olympic Gold Medalist) मानकरी बलबीर सिंह सिनिअर (Balbir Singh Sr) यांचे सोमवारी निधन झाले. ते 95 वर्षाचे होते. ते बराच काळ आजारी होते आणि त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात (Fortis Hospital) दाखल करण्यात आले होते. कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की त्यांना श्वसनेच्या त्रासानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र अखेर सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. मोहालीतील फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक अभिजीत सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सकाळी 6.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला.” बलबीर सिनिअर यांना 8 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने निवडलेल्या आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान ऑलिम्पियनपैकी एक, बलबीर हे देशाचा महान खेळाडू आहेत.
लंडन (1948), हेलसिंकी (1952) आणि मेलबर्न (1956) मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकण्यात बलबीरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नेदरलँड्सविरुद्ध 6-1 च्या विजयात त्यांनी पाच गोल केले, हा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. त्याच ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला 4-0 ने पराभूत केले. त्या सामन्याच्या पहिल्या 15 मिनिटांत त्यांनी दोन गोल केले होते. शिवाय, ते 1975 च्या वर्ल्डकप जिंकणार्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. 1957 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलबीर, भारताच्या 1975 वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 1971 मध्ये कांस्य पदकजिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. पद्मश्री बलबीर सिंह सीनियर हे एकमेव खेळाडू होते जे तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणार्या संघाची सदस्य होते.
इतकंच नाही तर 1956 साली मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण स्पर्धेत 38 गोल केले आणि विशेष म्हणजे प्रतिस्पर्धा संघाला भारताविरूद्ध एकही गोलची कमाई करता आली नाही. दरम्यान, डॉक्टरांनी यापूर्वी त्यांचा कोरोना व्हायरस चाचणीही केली ज्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 2018 मधेही निमोनियामुळे त्यांची तब्येत ढासळली होती. त्यावेळी त्यांना 90 दिवस पीजीआयमध्ये दाखल केले होते.