सुरेश रैनाने नातेवाईकांवर दरोडेखोरांच्या हल्ल्याबाबत सोडले मौन, पंजाब पोलिसांना प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती
सुरेश रैना (Photo Credits: Getty Images/File Image)

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीईके) सोडून सुरेश रैना भारतात परतला आहे. त्याच्या परतण्याबद्दल बर्‍याच प्रकारचे अनुमान लावले जात आहेत. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने त्याच्या परत येण्यामागील कौटुंबिक कारणे दिली. दरम्यान, रैनाने मंगळवारी ट्विट करून नातेवाईकांवर दरोडेखोरांच्या हल्ल्याबाबत सोडले मौन सोडले आणि पंजाब पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी अपील केले. काका आणि चुलतभावाच्या जिवावर बेतलेल्या गुन्ह्याचा तपशील उघड करीत रैनाने ट्विट केले की, “पंजाबमध्ये माझ्या कुटुंबासोबत जे घडलं ते भयावह होतं. माध्या काकांचा मृत्यू झाला. माझी आत्या आणि चुलत भावाला सुद्ध गंभीर दुखापत झाली. दुर्दैवाने माझ्या चुलत भावाचा मृत्यू झाला. तर, आत्या अजूनही व्हेंटिलेटरवर आहे.” (IPL 2020 Update: सुरेश रैनाच्या जागी CSK संघात 'या' तिन्ही खेळाडूंना मिळू शकते संधी, मराठमोळा रुतुराज गायकवाड देखील पर्यायी फलंदाज)

रैना पुढे म्हणाला की, "“त्या रात्री काय घडले हे आम्हाला आतापर्यंत माहित नाही. मी पंजाब पोलिसांना या प्रकरणात लक्ष देण्याचे आवाहन करीत आहे. त्यांच्याबरोबर हे कोणी केले हे जाणून घेण्याचा आम्हाला किमान अधिकार आहे. त्या गुन्हेगारांना पुढील गुन्हे करायला सोडले जाऊ नये.” पठानकोटमधील थरियाल या गावात राहणाऱ्या सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला. हे कुटुंब आपल्या घराच्या छतावर झोपलेले असतानाच अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर वार केल्याची माहिती आहे.

दोषींना पकडण्यासाठी रैनाने पंजाब पोलिसांची मदत मागितली आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना आपल्या पुढच्या ट्विटमध्ये टॅग केले.

29 ऑगस्ट रोजी सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन यांनी रैनाची आयपीएलमधून माघार घेतल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आणि सांगितले की, सध्या संपूर्ण टीम रैनाच्या कुटुंबासमवेत आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 2020 आवृत्तीत रैना भाग घेणार नाही. गेल्या महिन्यात रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा देखील केली होती.