T20 World Cup 2021: टीम इंडिया वर्ल्ड कपमधून OUT, ‘या’ 5 चुकांमुळे विराटची बुडाली नौका!
विराट कोहली आणि केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

आयसीसी T20 विश्वचषक (ICC T20 World Co=uo) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा या स्पर्धेच्या जेतेपदाची सर्वात मोठा दावेदार टीम इंडियाला मानले जात होते. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा, केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या स्टार आणि अनुभवी खेळाडूंनी भरलेला संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी मोठा धोका होता. पण भारतीय संघाने (Indian Team) टी-20 विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरी केली आणि संघ सुपर-12 फेरीतूनच बाहेर पडला. अफगाणिस्तानवर (Afghanistan) न्यूझीलंडच्या (New Zealand) विजयासह टी-20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ निश्चित झाला ज्यामध्ये भारताचे नाव नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून 2007 मध्ये टी-20 चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा (Team India) प्रवास संपुष्टात आला आहे. दरम्यान भारत गट 2 मध्ये उत्तम नेट रन-रेटसह एकूण तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. (NZ vs AFG, T20 World Cup 2021: अफगाणिस्तानवर 8 विकेटने मात करून न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, टीम इंडियाचा विश्वचषकातून पॅक-अप)

UAE येथे आयोजित यंदाच्या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानकडून 10 विकेटने लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर न्यूझीलंडनेही त्याला एकतर्फी सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवून भारताला धक्का दिला. हे दोन पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरले आणि पुढचे दोन सामने जिंकूनही त्यांच्या हाती निराशाच आली. या स्पर्धेत बलाढ्य टीम इंडियाने अशा कोणत्या चुका केल्या, ज्यांमुळे त्यांची नौका डुबली ते खालीलप्रमाणे आहेत.

1. इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेपर्यंत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अप्रतिम दिसत होती. पण आयपीएल 2021 च्या अखेरीस सर्वकाही बदलले. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला. टीमने त्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संधी दिली आणि पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया केवळ 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला एकही विकेट घेता आली नाही आणि पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर भारतीय संघ अचानक खूपच कमकुवत दिसू लागला.

2. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या टीम इंडियाने सराव सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी केली, पण लीग टप्पा सुरू होताच सगळे फ्लॉप झाले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताची टॉप ऑर्डर खराब झाली. इतकंच नाही तर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ इतका घाबरला की, रोहित शर्माला सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर उतरवलं. दुबईच्या खेळपट्टीवर फलंदाजांनी पुरेशा धावा केल्या नाहीत की, गोलंदाजांना त्याचा बचाव करता आला नाही.

3. भारतीय संघाच्या अपयशाचे तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे गोलंदाजांची चुकीची निवड. टीम इंडिया एकेकाळी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन मनगटी फिरकीपटूंसोबत मैदानात उतरायचा, पण या संपूर्ण स्पर्धेत विराट आणि कंपनीने रिस्ट स्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले नाही. पहिले चहलच्या अनुभवावर राहुल चाहरला प्राधान्य देण्यात आले आणि त्यानंतर या गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्येच संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांच्या मधल्या षटकांमध्ये टीम इंडियाला विकेटही काढता आल्या नाहीत.

4. नाणेफेक हेही टीम इंडियाच्या पराभवाचे चौथे प्रमुख कारण होते. दुबईतील दिवस-रात्रीच्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा करण्यात अडचणी येत होत्या आणि पहिल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली होती. रात्री पडणाऱ्या दवमुळे पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि न्यूझीलंडनेही 111 धावा आरामात केल्या.

5. टीम इंडियाच्या अपयशाचे पाचवे मोठे कारणबायो-बबल थकवा हे देखील टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्यानंतर लगेचच यूएईला पोहोचले आणि आयपीएल 2021 खेळले. त्यानंतर लगेचच टी-20 विश्वचषक सुरू झाला. बायो-बबल थकवा आणि जास्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना जड ठरले आहे आणि त्याचा उल्लेख स्वतः कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने केला आहे.