IND vs NZ, ICC T20 World Cup 2021: टीम इंडियाच्या ताफ्यात 3 मोठे बदल संभव, पहिल्याच सामन्यातून समोर आल्या कमजोर कडी; पहा संभाव्य XI
टीम इंडिया (Photo Credit: Twitter/BCCI)

विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या पहिल्याच सुपर 12 सामन्यात पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. विश्वचषकच्या इतिहासात भारताचा पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) हा पहिलाच पराभव ठरला. या सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) ज्याप्रकारे गुडघे टेकले त्यावरून विराट आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका होत आहे. तसेच संघ निवडीबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्याने आणि आर अश्विनला वगळण्यात आल्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही काळापासून गोलंदाजी करू न शकलेल्या हार्दिकचा फलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला. याशिवाय भुवीही काही काळापासून लयीत दिसत नाही. (T20 World Cup 2021: न्यूझीलंडविरुद्ध सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर; सराव सत्रात दिसला हार्दिक पांड्याचा All-rounder अवतार)

आता 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकणे भारतासाठी निर्णायक ठरेल. न्यूझीलंडविरुद्ध एक छोटीशी चूक टीम इंडियाला महागात पडू शकते. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताच्या उणिवाही समोर आल्या. अशा परिस्थितीत टीम इंडिया 3 बदलांसह न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरू शकते.

भारतासाठी 3 बदल संभव

हार्दिक दुखापतग्रस्त असून तो बऱ्याच महिन्यांपासून गोलंदाजी करू शकलेला नाही. अशा स्थितीत संघाचा समतोल साधण्यासाठी त्याच्या जागी ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. याशिवाय मिस्ट्री फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या जागी अनुभवी आर अश्विनला संधी दिली जाऊ शकते. पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या टी-20 विश्वचषक सामन्यात वरुणमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसली. आणि लयीत नसलेल्या भुवीच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध शार्दुल ठाकूरची निवड होऊ शकते. भुवीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएल 2021 च्या 11 सामन्यात 6 विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 7.97 होता. भुवीचा चेंडू खेळण्याची एकही संधी पाकिस्तानी फलंदाजांनी सोडली नाही. तथापि शार्दुलला संधी दिल्यास खालची फळी मजबूत होईल. शार्दुलच्या गेल्या 2 वर्षातील कामगिरीबद्दल बोलायचे तर तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज होता. त्याने 14 डावात 23 विकेट घेतल्या आहेत.

न्यूझीलंडविरुद्ध सामन्यातही संघावर मोठे दडपण असेल आणि अशा परिस्थितीत संघाला घातक गोलंदाजाची गरज आहे, त्याला अशा परिस्थितीत गोलंदाजी कशी करायची हे माहीत असेल. आणि याचा फायदा तो संघाला करून देऊ शकतो.