IPL 2021 Final, CSK vs KKR: अखेर धोनीची चेन्नईच ठरली सुपर ‘किंग’, ‘हे’ ठरले संघाच्या विजयाचे नायक
चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) चौथ्या आयपीएल (IPL) विजेतेपदाचा मान मिळवला आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) या महामुकाबल्यात चेन्नईने पहिले फलंदाजी करून 192 धावांचा डोंगर उभारला होता. पण धमाकेदार सुरुवातीनंतर मधल्या फळीच्या अपयशामुळे केकेआर (KKR) 165 धावाच करू शकले. परिणामी चेन्नईने आणखी एक आयपीएल ट्रॉफी जिंकली. धोनीच्या नेतृत्वातील सुपर किंग्स मुंबई इंडियन्सनंतर आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. मुंबईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल आपल्या नावे केले आहे तर, चेन्नईचे हे चौथा चॅम्पियनशिप विजय ठरला आहे. संघाच्या विजयात अनेक खेळाडूंनी आपल्या परीने योगदान दिले जे खऱ्या अर्थाने संघाच्या विजयाचे ‘हिरो’ बनले. (IPL 2021 Final: CSK चा आयपीएल विजेतेपदाचा चौकार, KKR ला 27 धावांनी लोळवून विजयच्या आशेवर पाणी फेरले)

फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)

दक्षिण आफ्रिकेचा हा दिग्गज सलामीवीर चेन्नईसाठी अंतिम चेंडूपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. डु प्लेसिसने सलामी जोडीदार रुतुराज गायकवाडसह 61 धावांची भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा भक्कम पाया रचला. दुसऱ्या बाजूने त्याला रॉबिन उथप्पा आणि मोईन अलीची अधिक काळ साथ मिळाल्याने तो मुक्तपणे मोठे फटके खेळत राहिला. त्याच्या या खेळीच्या जोरावर चेन्नईने धावांचा डोंगर उभारला ज्यामुळे कोलकाता फलंदाजांवरील दबाव वाढला.

शार्दूल ठाकूर (Shardul Thakur)

व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिलने संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोंघांमध्ये 91 धावांची भागीदारी झाली. दोघांनी चेन्नई गोलंदाजानावर हल्ला चढवला आणि सुरुवातीला त्यांच्यावर तणाव आणला. पण अखेरीस ‘लॉर्ड’ शार्दूल एकाच षटकात अय्यर आणि नितीश राणा यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला व संघाला सामन्यात कमबॅक करून दिले. निर्णायक क्षणी देखील ठाकूरने केकेआरचा मॅच-विनर राहुल त्रिपाठीला माघारी धाडलं.

एमएस धोनी (MS Dhoni)

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्वाचे जितके कौतुक केले जावे तितके कमीच आहे. माहीने सुरुवातीपासून चेन्नईचे कर्णधार म्हणून पुढाकाराने नेतृत्व केले आहे. आणि अंतिम सामन्यात देखील त्याची तिचं जुनी शैली सर्वांना पुन्हा एकदा पाहायला मिळाली. सुरुवातीला संघ विकेटसाठी संघर्ष करताना त्याने आपल्या सर्वात विश्वासू शार्दूल ठाकूरकडे चेंडू सोपवला ज्याने निराश न करता संघाला एकाच षटकात दोन मोठ्या विकेट मिळवून देत सामन्यात पुनरागमन करून दिले. यानंतर संघाला नियमित अंतराने विकेट मिळत राहाव्यात यासाठी गोलंदाजांवर विश्वास दाखवला.