विराट कोहली न्यूझीलंड दौऱ्यावर पुन्हा एकदा फ्लॉप; 2004 इंगलंड दौऱ्यानंतरचा सर्वात वाईट फॉर्म, 19 डावापासून शतकाचा दुष्काळ कायम
विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध वेलिंग्टन येथे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया (India) मैदानावर आली. कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) या सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करण्यात अपयशी ठरला. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये दोन झटके बसल्यावर विराट संघाचा डाव सावरू शकला नाही. कोहली अवघ्या 2 धावा करून मैदानाबाहेर परतला. विराटला न्यूझीलंडकडून डेब्यू करणाऱ्या काईल जेमीसन (Kyle Jamieson) ने रॉस टेलरकडे कॅच आऊट केले. यंदाच्या किवी दौऱ्यावर कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. न्यूझीलंड दौर्‍यावर विराट आजवरच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 8 डावात फक्त 1 अर्धशकात ठोकू शकला यावरून त्याच्या निकृष्ट स्वरूपाचा अंदाज येऊ शकतो. इतकेच नव्हे तर नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरूद्ध 136 धावा केल्यानंतर कोहलीने आतापर्यंत 19 डावांमध्ये एकही शतक ठोकलेले नाही. (न्यूझीलंडच्या घातक वेगवान गोलंदाजीपुढे अपयशी ठरलेल्या भारतीय फलंदाजांनी नक्की पाहावा राहुल द्रविडचा हा Video)

कोहलीचा खराब फॉर्म त्याच्या 2014 च्या इंग्लंड दौर्‍याची आठवण करून देतो जिथे तो वारंवार फ्लॉप ठरला. यावर्षी फेब्रुवारी ते ऑक्टोबर दरम्यान कोहलीच्या फलंदाजीने सलग 25 डावात कोणतेही शतक झळकावले नव्हते. या कालावधीत इंग्लंड दौर्‍यावर खेळल्या गेलेल्या 5 कसोटी सामन्यात कोहलीने केवळ 134 धावा केल्या, ज्यामध्ये 39 धावा त्याची सर्वश्रेष्ठ धावसंख्या ठरली. कोहलीच्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत असा खराब टप्पा फक्त 2 वेळा आला जेव्हा त्याला सलग 19 पेक्षा जास्त डावांमध्ये शतक करता आले नाही.

कोहलीचा सध्याचा शतकाचा दुष्काळ हा त्याच्या कारकिर्दीतीलतिसरा सर्वात मोठा आणि इंग्लंड दौर्‍यानंतरचा दुसरा आहे. बांग्लादेशविरुद्ध शेवटची कसोटी मालिका संपेपर्यंत कोहलीने प्रत्येक सहाव्या डावात आंतरराष्ट्रीय शतक ठोकले आहेत. अजून एका गोष्टीने कोहलीचा खराब फॉर्म समोर येतो आणि ते म्हणजे कोहलीने मागील 19 डावात 6 अर्धशतकं केली आहेत. दरम्यान, कॅप्टन कोहली व्यतिरिक्त पहिल्या डावात इतर भारतीय फलंदाजांच्या कामगिरीबद्दल आपण बोललो तर काहीही विशेष नाही. वेलिंग्टन कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. भारताचा निम्मा संघ 101 धावांवर माघारी परतला. किवी गोलंदाजांसमोर कोणताही भारतीय फलंदाज क्रीजवर जास्त काळ टिकू शकला नाही. सलामीवीर मयंक अग्रवाल 34 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सराव सामन्यात 94 धावांची उत्कृष्ट खेळी करणारा चेतेश्वर पुजाराने अवघ्या 11 धावा केल्या.