IND v NZ, 1st Test: अक्षर पटेलचा गोलंदाजांच्या एलिट यादीत समावेश, Kyle Jamieson न्यूझीलंड कडून 50 टेस्ट विकेट घेणारा सर्वात वेगवान
काईल जेमीसन आणि अक्षर पटेल (Photo Credit: PTI)

कानपुरच्या (Kanpur) ग्रीन पार्क येथे खेळला जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमीसनने (Kyle Jamieson) बॉलने चांगला प्रभाव पाडला आहे. किवी संघाला पहिल्या डावात 296 धावांवर रोखण्यात पटेलने मोठी भूमिका बजावली. डावखुरा फिरकीपटूने कानपूर येथे 2 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या मधल्या फळीला टार्गेट करत कसोटी क्रिकेटमधील केवळ 7 व्या डावात पाचव्यांदा 5 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पटेल हा कमाल करणारा संयुक्त दुसऱ्या जलद गोलंदाज ठरला. कानपूरमध्ये 5 विकेट्स घेत अक्षराने चार्ली टर्नर आणि टॉम रिचर्डसन यांची या प्रकरणात बरोबरी केली आहे. (IND vs NZ 1st Test Day 3: न्यूझीलंड पहिल्या डावात 296 धावांत गारद, तिसऱ्या दिवसाखेर टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात एक बाद 14 रन)

इतकंच नाही तर अक्षर आपल्या पहिल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 5 विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला. त्याने टॉम रिचर्डसन आणि रॉडनी हॉग यांच्या पराक्रमाची बरोबरी केली आहे ज्यांनी त्यांच्या पहिल्या 4 कसोटीत 5 वेळा 5 विकेट घेतले होते. उल्लेखनीय म्हणजे चार्ली टर्नर पहिल्या 4 कसोटी सामन्यात 6 वेळा 5 विकेट घेत यादीत अव्वल आहे. पटेलने त्याच्या कसोटी कारकिर्दीची उल्लेखनीय सुरुवात केली. यंदा वर्षाच्या सुरुवातीला मायदेशात इंग्लंडविरुद्ध मालिकेत 3 कसोटी सामन्यांमध्ये 27 विकेट घेतल्या. दुसरीकडे, भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात भारताच्या शुभमन गिलला बाद करताना जेमीसन न्यूझीलंडकडून (New Zealand) सर्वात जलद 50 टेस्ट विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. जेमीसनने केवळ नऊ कसोटींमध्येच हा भीम पराक्रम केला आहे. न्यूझीलंडसाठी यापूर्वी हा विक्रम शेन बाँडच्या नावे होता ज्यांनी 12 कसोटी सामन्यांमध्ये टप्पा सर केला होता. जेमीसन हा भारतासाठी सर्वात घातक गोलंदाज असल्याचे सिद्ध झाले आहे आणि टीम इंडियाविरुद्ध त्याने फक्त चार कसोटी सामन्यात तब्ब्ल 20 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, भारताने पहिल्या डावात 345 धावा केल्या. प्रत्युत्तरात गोलंदाजांच्या शानदार खेळीने न्यूझीलंडला 296 धावांवर गुंडाळले. यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला येत दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 5 षटकांत एक बाद 14 अशी होती. जेमीसन पुन्हा एका किवी संघासाठी पुढे सरसावला आणि शुभमन गिलला त्रिफळा उडवून संघाला पहिला दिलासा दिला.