Water Cut In Mumbai: मुंबईत 29-30 नोव्हेंबर दरम्यान 10 वॉर्ड्स मध्ये 24 तास पाणी कपात; अंधेरी मध्ये प्रामुख्याने जाणवणार प्रभाव
मुंबईत (Mumbai) बीएमसी (BMC) कडून 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणी कपातीची (Water Cut) घोषणा जारी करण्यात आली आहे.
मुंबईत (Mumbai) बीएमसी (BMC) कडून 29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान 24 तास पाणी कपातीची (Water Cut) घोषणा जारी करण्यात आली आहे. या 24 तासांमध्ये 10 वॉर्ड्समध्ये पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. के पूर्व (K East) आणि के पश्चिम (K West) या दोन भागांमध्ये अधिक पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
के पूर्व प्रभागात अंधेरी पूर्व, एमआयडीसी, सीप्झ, जोगेश्वरी पूर्व आणि इतर उपनगरातील प्रमुख भागांचा समावेश आहे. गुंदवली, नेहरू नगर आणि आझाद नगर या भागात 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होईल. तर आनंद नगर, समर्थ नगर आणि शेर-ए-पंजाब भागात 30 नोव्हेंबरला पाणीपुरवठ्यात कपात होणार आहे. उर्वरित भागात मात्र पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होईल. असे सांगण्यात आले आहे.
के पश्चिम वॉर्डात राहणार्या सुमारे 7.5 लाख लोकांना 24 तासांच्या पाणीकपातीचा फटका बसेल असा अंदाज आहे. ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू या मेट्रो भागांना 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच के पश्चिम प्रभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान म्हणाले की, पाणीपुरवठा कपातीच्या काळात कूपर रुग्णालयाला पाणी देण्यासाठी बीएमसीचे टँकर वापरले जातील. नक्की वाचा: Mumbai Water Supply: मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे सात तलाव 97.44 टक्के भरले .
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पवई आणि वेरावली जलाशयाच्या भागात दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. ही दुरुस्तीची कामे 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 ते 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेपर्यंत चालणार आहेत. दुरुस्तीच्या कामांमध्ये पवईतील 300 मिमी पाइपलाइन तसेच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिमी पाइपलाइनच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2022 12:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

