
Vidarbha Development News: रेल्वे पायाभूत सुविधा आणि प्रादेशिक विकासाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने (CCEA) महाराष्ट्रातील वर्धा आणि बल्हारशाह (Wardha-Balharshah 4th Railway Line) दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. 3,399 कोटी रुपयांचा हा प्रकल्प (Wardha Balharshah Railway Project) भारतीय रेल्वेच्या प्रमुख मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये क्षमता वाढवण्याच्या आणि कार्यक्षमता सुधारण्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे. भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी मल्टि-ट्रॅकिंग प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
दिल्ली-चेन्नई कॉरिडॉरवरील ताण होणार कमी
एकूण 134.52 किमी लांबीचा हा ब्राउनफिल्ड प्रकल्प सध्या चालू असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या जोडीने कार्यरत राहणार आहे. सध्या दिल्ली-चेन्नई हाय डेनसिटी कॉरिडॉरवर 152% वापर होत असून, हा प्रकल्प यावरचा ताण कमी करेल. कोळसा, पोलाद, सिमेंट यांसारख्या औद्योगिक मालाच्या वहनासाठी ही लिंक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (हेही वाचा, Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प; 300 km मार्ग पूर्ण; तपशील घ्या जाणून)
विद्यमान रेल्वे कॉरिडॉरचा उपयोग करून भू-संपादन
या प्रकल्पात विद्यमान भारतीय रेल्वे मार्गाचाच वापर केला जाणार असून, यामुळे अतिरिक्त भू-संपादनाची गरज भासणार नाही. वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमधील वाहतुकीची कोंडी कमी करणे, नागपूर आणि प्रमुख बंदरांशी जोडणी सुधारणे यावर भर दिला जाणार आहे. यासाठी मोठ्या व लहान पुलांचे बांधकामही करण्यात येणार आहे. (हेही वाचा, Mumbai-Ahmedabad Bullet Train Project: जपान भारताला 2 बुलेट ट्रेन भेट म्हणून देणार; मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या चाचण्यांसाठी होणार वापर)
स्थानिक उद्योगांना चालना आणि पुरवठा साखळी होणार सशक्त
या प्रकल्पामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळणार असून, चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आणि बल्लारपूर पेपर मिल्ससारख्या आस्थापनांचा फायदा होणार आहे. पुरवठा साखळी सुधारून आर्थिक वाढीला गती दिली जाणार आहे.
पीएम गति शक्ती योजनेचा भाग
हा प्रकल्प पीएम गति शक्ती नॅशनल मास्टर प्लॅनअंतर्गत असून, यात मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी आणि एकात्मिक नियोजनावर भर आहे. हा प्रकल्प 2029–30 पर्यंत पूर्ण होणार असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील चार जिल्ह्यांत 176 किमी रेल्वे नेटवर्क वाढणार आहे. या भागातील सुमारे 784 गावांमधील 19.74 लाख लोकसंख्येला याचा थेट फायदा होणार आहे.
पर्यावरणपूरक आणि आर्थिक लाभ
रेल्वे ही पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली असल्यामुळे या प्रकल्पातून पुढील लाभ होणार आहेत:
- 20 कोटी लिटर इंधन आयात टळणार
- 99 कोटी किलो CO2 उत्सर्जनात घट — हे 4 कोटी झाडे लावण्याच्या परिणामासारखे
- 18.40 MTPA अतिरिक्त मालवाहतूक होण्याची शक्यता
- रोजगार निर्मिती आणि आत्मनिर्भर भारताची दिशा
या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सुमारे 74 लाख मानव-दिवसांचे थेट रोजगारनिर्मिती होणार आहे. यामुळे स्थानिक रोजगार वाढेल, वाहतूक सुलभ होईल आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनास मजबुती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.