Maharashtra Bandh: 'वंचित'कडून आज 'महाराष्ट्र बंद'ची हाक; पहाटेच बस अडवण्याचा घाटकोपर मध्ये करण्यात आला प्रयत्न
Maharashtra Bandh Today: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. दिल्ली, आसाम, तामिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील आता या कायद्याला कडाडून विरोध करण्यात येत आहे.
Maharashtra Bandh Today: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. दिल्ली, आसाम, तामिळनाडू पाठोपाठ आता महाराष्ट्रात देखील आता या कायद्याला कडाडून विरोध करण्यात येत आहे. CAA विरोधात आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये विविध संघटना सामील होणार असून त्यात प्रामुख्याने कामगार संघटना व मुस्लीम संघटनांचा सहभाग असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबईत या आधी देखील CAA विरोधात आंदोलनं करण्यात आली आहेत. वंचित बहुजन आघाडीने तर या आधी धरणं आंदोलन पुकारलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी त्या आंदोलनाचे नेतृत्व केले असून सुमारे ५ हजारहून जास्त कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सामील झाले होते.
आज पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांनी बंदची हाक दिली आहे. आणि त्याचे पडसाद म्हणजे सकाळीच घाटकोपरमध्ये एक बेस्टची बस थांबवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. त्यामुळे काही काळासाठी त्या परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती परंतु, नोकरदार वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून आता पुन्हा तिथली वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
या बंदला वंचित बहुजन आघाडीसोबतच तब्बल 35 संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, CAA कायद्याविरोधात या आधी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातील (Jamia Millia Islamia University) विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. तेव्हा पोलीस विरुद्ध विद्यार्थी अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली असतांना अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी देखील विद्यार्थ्यांनाच पाठिंबा दर्शवला होता. तसेच आसाम आणि मेघालया या दोन राज्यांमधील नागरिकांकडून देखील या कायद्याला कडाडून विरोध करण्यात आला होता.
(The above story first appeared on LatestLY on Jan 24, 2020 08:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

