Uddhav Thackeray Press Conference Delhi: भाजप भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे, सर्व ठग भाजपमध्ये; उद्धव ठाकरे यांचा दिल्ली येथे घणाघात
Uddhav Thackeray (Photo Credit: X/ANI)

देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक भारतीय जनता पक्षात गेले आहेत. त्यामुळे तो पक्ष आता भ्रष्ट जनता पार्टी झाला आहे. इतकेच नव्हे तर ते आम्हाला ठग म्हणतात पण देशात जेवढे ठग आहेत त्या सर्वांचेच भाजपमध्ये स्वागत झाले आहे, असा घणाघात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटक आणि कारवाईविरोधात इंडिया आघाडीने एकजूट दाखवत आज दिल्लीत ‘लोकतंत्र बचाओ महारॅली’चे आयोजन केले आहे. या रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद (Uddhav Thackeray Press Conference) घेतली. या वेळी ते बोलत होते.

परिवारवादी राजकारणाच्या आरोपांना उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना (भाजप) कुटुंबाचा अर्थ समजत नाही. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागेल. आता, त्यांच्याकडे दुसरा कोणताही अजेंडा नाही. इलेक्टोरल बाँडचा (Electoral Bond) मुद्दा समोर आल्यापासून लोकांना भाजपचा खरा चेहरा म्हणजेच 'भ्रष्ट जनता पार्टी'चा कळला आहे. हा पक्ष भ्रष्टाचाऱ्यांचा आहे. यातील सगळे भ्रष्ट लोक आहेत. भ्रष्ट लोकच भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे ते 'भ्रष्ट जनता पार्टी' झाले आहेत, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देऊ केल्या; प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपावर Sanjay Raut यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक ही दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी झाली नाही. मद्य धोरण गैरव्यवहार हे केवळ निमित्त आहे. त्यांना अटक करण्याचे खरे कारण इलेक्ट्रोल बॉन्डपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे भटकवणे हा आहे. निवडणूक रोखे आणि त्याद्वारे झालेला भ्रष्टाचार लपवायचा कसा याबाबत भाजप धास्तावले आहे. त्यामुळे त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत भाजप उपाययोजना करत आहे. केजरीवाल यांना झालेली अटक हा त्याचाच भाग असल्याचे केजरीवाल म्हणाले. (हेही वाचा -INDIA Bloc Mega Rally: केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत 31 मार्च रोजी इंडिया ब्लॉकची मेगा रॅली, आप-काँग्रेसची घोषणा)

व्हिडिओ

अरविंद केजरीवाल मागे एकदा मला मुंबईत भेटले. तेव्हा ते भाजपविरोधात ठाम होते. इतकेच नव्हे तर भाजपच्या हुकुमशाहीविरोधात लढण्यासाठी नेमके काय करावे लागेल याबाबत ते बोलत होते. भाजपचे हे तत्व आहे. आपल्यासमोर विरोधकच राहिला नाही पाहिजे. जे विरोधात जातील त्यांना खोट्या प्रकरणा अडकावायचे, केंद्रीय यंत्रणांना हाताला धरुन अटक करायची. चुकीच्या कारवाया करायच्या. अगदीच ते जमले नाही तर मग विरोधकांची प्रतिमा मलीन करायची. त्यांच्या कुटुंबीयांचे प्रतिमाहनन करायचे. पण, आम्ही भाजपला घाबरत नाही. आम्ही ठरवले आहे. भाजपविरोधातील लढाई जनतेच्या न्यायालयात जाऊन लढायची, असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.