सुप्रिया सुळे म्हणतात 'शरद पवार हे माझे बॉस, त्यामुळे बॉस इज ऑलवेज राईट'
Supriya Sule | (Photo Credit: Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोबत काम करण्याची ऑफर दिली होती' या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रसारमाध्यमांत मोठी खळबळ उडवून दिली. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. नरेंद्र मोदी यांची ही उदारता होती. परंतू, माझ्या वडीलांनी त्यास नम्रतापूर्वक नकार दिला. मी त्या बैठकीत नव्हते. परंतू, ही दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेली बैठक होती. महाराष्ट्रात व्यक्तिगत संबंधांना मोठे महत्त्व आहे. दोन्ही नेत्यांमध्ये वैचारीक मतभेत असू शकतात परंतू, त्यांच्यात मनभेद नसतात', असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

एनटीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या वेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी 'शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या ऑफरला नम्रपणे नकार दिला' असे सांगितलेच. परंतू, 'शरद पवार हे माझे वडील आहेत परंतू, ते माझे बॉसही आहेत. त्यामुळे बॉस इच ऑलवेज राईट' असेही सुप्रिया या वेळी म्हणाल्या.

एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ऑफरबाबत गौप्यस्फोट केला होता. शरद पवार यांच्या या गौप्यस्फोटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यान, शरद पवार यांनी दिलेल्या माहितीवर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवार यांनी केलेल्या दाव्याबाबत जो पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत त्याल ग्राह्य मानता येणार नाही. परंतू, दोन्ही नेते अत्यंत वरिष्ठ आहेत. त्यामुळे दोन वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीचा तपशील अशा पद्धतीने बाहेर सांगणे हे नैतिकतेला धरुन नाही. (हेही वाचा, शरद पवार यांनी दाखला देताच शिवसेनेला पाठिंबा देण्यास सोनिया गांधी झाल्या राजी, उलघडलं गुपीत)

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. राज्यात घडलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडींनंतर महाविकासआघाडी अस्तितवत आली. या आघाडीचे नेतृत्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. तत्पर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. ही राष्ट्रपती राजवट रातोरात हटविण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला आणि भल्या सकाळी कोणासही खबर न लागू देता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.