Lockdown बाबत खोटी अफवा पसविणा-यांवर कठोर कारवाई होणार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
Anil Deshmukh (Photo Credits: ANI)

राज्यात नागरिकांकडून कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र अनेक भागात दिसले. ज्याचा परिणाम फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत गेली. यामुळे देशात लॉकडाऊन होणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. दरम्यान काल (21 फेब्रुवारी) मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन (Lockdown) करायचा की नाही हे मी नागरिकांवर सोडले आहे असे सांगितले. तरीही अनेक जण लॉकडाऊनच्या अफवा पसरवत आहे. "महाराष्ट्रात लॉकडाऊन बाबत खोटी अफवा पसरविणा-यांवर कडक कारवाई केली जाणार" अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली.

"महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत" अशा आशयाचे ट्विट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.हेदेखील वाचा- Lockdown: लॉकडाऊनचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रवीण दरेकर यांचा खोचक सवाल

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

राज्यात लॉकडाऊन हवे की नको ही गोष्ट मी पूर्णपणे जनतेवर सोडले असून पुढील आठ दिवसांत मला त्यांच्याकडून कळेल. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे ते नियमांचे उल्लंघन करतील, ज्यांना नको ते कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळतील" असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान राज्यात आज 5210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1999982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 53113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे.