कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार; राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची घोषणा
MSRTC Bus | (File Image)

कोरोना विषाणूचे (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी येत्या 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउनची (Lockdown) घोषणा केली होती. या कालावधीत नागरिकांनी अत्यावश्यक सेवा वगळता कोणीतीही सुविधा मिळत नाही. दरम्यान, महाराष्ट्रातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, मेडिकल चालक, पोलीस यांच्याबरोबर एसटीचे कर्मचारी देखील आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आहेत. यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी केली आहे.

कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्याकरिता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली होती. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता देशातील सर्व  व्यवहार बंद झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दळणवळणाची सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने एसटी महामंडळावर टाकली आहे. त्यानुसार 24 मार्चपासून  मुंबई आणि उपनगरातील विविध ठिकाणावरून अत्यावश्यक सेवेत महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घेऊन जाण्याची जबाबदारी एसटीचे  कर्मचारी यशस्वीपणे पार पाडत आहेत, असे विधान अनिल परब यांनी केले आहे. तसेच त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना दररोज 300 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशी घोषणा अनिल परब यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे नवे 120 रुग्ण आढळून आल्याने आकडा 868 वर पोहचला, आरोग्य विभागाची माहिती

ट्विट-

दररोज एसटी कर्मचारी चालक, वाहक, यांत्रिकी, सफाई कामगार आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवत आहेत. केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे,पालघर रायगड अशा विविध विभागातून एसटी कर्मचारी कार्यरत आहेत. महत्वाचे म्हणजे, ज्या कर्मचाऱ्यांकडे मुंबईत राहण्याची सोय नाही, अशा कर्मचाऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था एसटी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेसाठी मास्क आणि सॅनेटरी लिक्विडची बाटली देण्यात येत आहे. अशाच कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे, अशीही माहिती परब यांनी दिली.