Social Media Love Story: सोशल मिडियाद्वारे अमरावतीची 34 वर्षांची महिला पडली 80 वर्षांच्या वृद्धाच्या प्रेमात; कोर्टाच्या आवारात केले लग्न, जाणून घ्या काय आहे ही आगळी-वेगळी लव्ह स्टोरी
80 Year Old Man Ties Knot With 34-Year-Old Women (संग्रहित संपादित प्रतिमा)

Social Media Love Story: प्रेमाला वयाचे बंधन नसते... आजकाल अशा घटना खऱ्या आयुष्यातही पाहायला मिळतात. ताजे प्रकरण मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) समोर आले आहे, जिथे एका 80 वर्षीय व्यक्तीने 34 वर्षीय महिलेशी लग्न केले आहे. सध्या ही वृद्ध व्यक्ती आणि या महिलेच्या लग्नाची चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. या दोघांच्या भेटीबद्दल बोलायचे झाले तर, या दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली. त्यानंतर ते मित्र झाले आणि कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. आता या दोघांनीही मंदिरात पूर्ण विधीवत लग्न केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मगरिया सुसनेर येथील रहिवासी बाळूराम हे शेतीचे काम करतात. बाळूराम हे सोशल मीडियावरही खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्सही आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची अमरावती येथील रहिवासी 34 वर्षीय शीला इंगळे यांच्याशी मैत्री झाली. दोघांमधील संवाद फक्त सोशल मीडियावर सुरू होता. पण नंतर दोघांनीही एकमेकांचे नंबर शेअर केले आणि रोज बोलू लागले. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते कोणालाच कळले नाही आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अहवालानुसार 80 वर्षांचे बाळूराम 2 वर्षांपूर्वी नैराश्यात गेले होते. बाळूराम यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. सर्वजण विवाहित आहेत आणि वेगळे राहतात. बाळूराम यांच्या पत्नीची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचा मृत्यू झाला. बाळूराम यांच्यावर काही कर्जही होते. पत्नीचा मृत्यू, कर्ज आणि एकटेपणामुळे ते आजारी पडले. त्यानंतर गावातील विष्णू गुर्जर या तरुणाने त्यांची मदत केली. विष्णूच्या मदतीने बाळूराम यांनी रील बनवायला सुरुवात केली व हळूहळू त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात शीलाच्या रूपाने पुन्हा प्रेम आले. (हेही वाचा: Noida Crime: सासरच्या मंडळीकडून विवाहित महिलेला बेदम मारहाण, घटनेत पीडितेचा मृत्यू, उत्तर प्रदेशातील खळबळजनक घटना)

दोघांनी प्रथम कोर्टात लग्नासाठी अर्ज केला, कोर्टाने अर्ज स्वीकारल्यानंतर दोघांनी आधी कोर्टात लग्न केले. त्यानंतर कोर्टाच्या आवारात असलेल्या हनुमान मंदिरात हार घालून दोघांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. या लग्नाला दोघांच्या ओळखीचे लोक आले होते.