Shraddha Murder Case: श्रद्धाने 2020 मध्ये आफताबविरुद्ध केली होती तक्रार; महाराष्ट्र सरकार करणार चौकशी, Devendra Fadnavis यांची माहिती
Devendra Fadanvis (Photo Credit - Twitter)

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडात (Shraddha Walkar Murder) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताबने मोठ्या नियोजनाने श्रद्धाची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले. आता तो पोलिसांची तसेच न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. रागाच्या भरात चुकून ही हत्या केल्याचे आफताबने न्यायालयात सांगितले. मात्र, आता याप्रकरणी पोलिसांना मोठा सुगावा लागला आहे. आरोपी गेल्या 2 वर्षांपासून श्रद्धाला मारण्याचा कट रचत होता.

त्याने दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाची हत्या करून तिचे तुकडे केले असते, मात्र त्यावेळी श्रद्धा पोलिसांपर्यंत पोहोचली होती. श्रद्धाने 23 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्रातील तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार केली होती की, तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब तिला मारून तिच्या शरीराचे तुकडे करून फेकून देण्याची धमकी देत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

फडणवीस म्हणाले की, मी श्रद्धाची 2020 ची तक्रार पाहिली, ज्यामध्ये खूप गंभीर आरोप करण्यात आले होते. तक्रारीवर कारवाई का झाली नाही याची चौकशी केली जाणार आहे. मला कोणावर आरोप करायचे नाहीत, पण पत्रावर कोणी कारवाई केली असती, तर आज असे झाले नसते. वेळीच कारवाई झाली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता. आफताब मला शिवीगाळ करतो आणि निर्दयपणे मारतो, असेही श्रद्धाने तिच्या तक्रारीत लिहिले आहे.

या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांकडून घेतली असता त्यांनी सांगितले की, श्रद्धाने तक्रार दाखल केली होती, मात्र तिने तक्रार मागे घेतली होती, त्यामुळे आम्ही कारवाई करू शकलो नाही.  आफताबच्या पालकांच्या सांगण्यावरून 19 डिसेंबर 2020 रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली होती. आपापसात नेहमीच भांडणे होत असल्याचे त्यांनी श्रद्धाला सांगितले होते. यानंतर श्रद्धाने तक्रार मागे घेतली.

यानंतर पोलिसांनी त्यांना समज पत्रही दिले होते. त्यावेळी श्रद्धाने सांगितले की, ‘मी माझा मित्र आफताब अमीन पूनावालासोबत एकाच घरात राहत आहे. 23 नोव्हेंबर 2020 रोजी अफताबने माझ्यावर हल्ला केला. यामुळे मी रागाने तक्रार केली, मात्र त्यानंतर आफताबचे आई-वडील आमच्या घरी आले आणि त्यांनी आमच्यात तडजोड करून आमचे भांडण संपवले. त्यामुळे मी माझी तक्रार मागे घेत आहे.’ (हेही वाचा: Nagpur Cyber Crime: मित्र असल्याचे भासवून नागपुरमधील व्यक्तीला घातला 18.5 लाखांचा गंडा)

समन्स लेटरमध्ये श्रद्धाला नोटीस देण्यात आली होती की तुळींज पोलीस ठाण्यात 23 नोव्हेंबर 2022 रोजी केलेली तक्रार मागे घेण्यात आली आहे. तुमच्या (श्रद्धा) आणि आफताब अमीन पूनावाला यांच्यात तडजोड झाली आहे त्यामुळे ही तक्रार बंद केली जात आहे.