'आदित्य ठाकरे यांनी आपल्यासारखा गायनाचा छंद जोपासला नाही' असे सांगत शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीसांना लगावला टोला
Amruta Fadnavis and Manisha Kayande (Photo Credits: FB/ANI)

भाजपच्या एल्गार आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेबाबत केलेले विधान सध्या बरेच चर्चेत आहे. MIM नेते वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानावर टिका करत शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील पण आम्ही बांगड्या घातल्या या विधानाचा निषेध करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही त्यांनी खडे बोल सुनावले होते. त्यावर बुधवारी (25 फेब्रुवारी) अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)  यांनी ट्विटच्या माध्यमातून 'ज्यांना सर्व आयतं मिळालं आहे त्यांना याची किंमत कळणार नाही' अशी बोचरी टिका केली होती. यावर आज शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी 'आदित्य ठाकरे यांना तुमच्यासारखा गायनाचा छंद नाही' अशा शब्दांत टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केले होते. त्यात त्यांना 'रेशमी किड्याला आयुष्यातील उपहास कधीच समजणार नाही, कारण पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन 'रेशमी' आयुष्याचा उपभोग घेतच त्यांची भरभराट होते', असे म्हटले होते. आदित्य ठाकरे यांच्या 'बांगड्या' वरील ट्विटवर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, पतीवर केलेल्या वक्तव्यावर अशा शब्दांत दिले उत्तर

अमृता फडणवीस यांचा या विधानावर प्रत्युत्तर देत शिवसेना नेत्या अॅड. मनिषा कायंदे यांनी कडक शब्दांत टोला लगावला आहे. "आदित्य ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वारसा लाभलेले नेते आहेत. वडील मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी (गायनाचे) छंद पूर्ण केले नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा छंद जोपासला आहे", असे म्हणत कायंदे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

आता पाहायचे हे आहे की यावर अमृता फडणवीस काय उत्तर देतात ते. महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले होते. तसेच या विधानाबाबत माफी मागण्याचे आवाहन ही केले होते.