सावरकरांना मानत नाहीत त्यांना भर चौकात फटकावले पाहिजे : उद्धव ठाकरे
Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray | (Photo Credits: ANI)

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्या पुतळ्याची विटंबना दिल्ली विद्यापीठ (University of Delhi) आवारात करण्यात आली. या घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखठोक आणि आक्रमक भूमिका घेत स्वातंत्र्यवीर सावरक यांना न मानणाऱ्यांना आणि त्यांची विटंबना करणाऱ्यांना भर चौकात फटकवले पाहिजे, असे म्हटले आहे. सावरकर पुतळ्यासोबत घडलेल्या घटनेनंतर उद्धव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकरी पीक विमा (Farmers Crop Insuranc) संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना सावरकर पुतळा विटंबनेबद्दल प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका व्यक्त मांडली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शेतकरी पीक विमा योजनेतील झारीतल्या शुक्राचार्यांना शोधलं पाहिजे, अशी मागणीही केली.

गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना शेतकरी पीक विमा योजनेबद्दल आक्रमक आहे. शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळावा अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, पीक विमा कंपन्यांनी काही शेतकऱ्यांना पीक विम्याच लाभ दिला. पण, या कंपन्यांनी पीक विमा देताना अनेक शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने अपात्र ठरवले. याच मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळे १० लाख शेतकऱ्यांना भरपाई मिळाली मात्र ९० लाख शेतकऱ्यांना मिळाला नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. या मुद्द्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पीक विमा कंपन्यांनी कोणत्या मुद्द्यावर शेतकऱ्यांना अपत्र ठरवले याचा आम्ही शोध घेणार आहोत. (हेही वाचा, दिल्ली विद्यापीठात वीर सावरकर यांच्या पुतळ्याची NSUI कार्यकर्त्यांकडून विटंबना, ABVP ने केली कठोर कारवाईची मागणी (Watch Video))

दरम्यान, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांची योजना आहे. पीक विम्यात जे पैसे आहेत ते शेतकरी आणि सरकारचे पैसे आहेत. मग, हे मधले झारीतले शुक्राचार्य कोण आहेत? त्याचा शोध घ्यायला हवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. पीक विमा शेतकऱ्यांना पैसे देत नसतील तर, सरकारने ते पैसे परत घ्यावेत आणि शेतकऱ्यांना द्यावेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत तर, शिवसेना पुन्हा आंदोलन करेन असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला.