Archana Barne Passes Away: पिंपरी चिंचवड येथील भाजप नगरसेविका अर्चना बारणे यांचे डेंग्यू आजाराने निधन
Archana Barne | | (File Photo/Facebook)

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील भाजप नगरसेविका अर्चना बारणे (Archana Barne) यांचे निधन झाले आहे. अर्चना यांना डेंग्यू (Dengue) आजाराचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पिंपरी येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाठिमागील काही दिवसांपूर्वी अर्चना तानाजी बारणे यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. नगरसेविका अर्चना बारणे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

अर्चना बारणे यांची प्रकृती उपचारादरम्यान सुधारावी यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. मात्र, त्याला यश येऊ शकले नाही. त्यांची प्रकृती खालावतच गेली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. थेरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजप तिकीटावर निवडूण येण्याची अर्चना बारणे यांची ही पहिलीच वेळ होती. शिवतीर्थनगर, प्रभाग क्रमांक 23, समर्थनगर, केशवनगरमधून त्या पीसीएमसीवर भाजपचे प्रतिनिधित्व करत होत्या. त्यांना स्थायी समिती सदस्य आणि 'ग' प्रभाग कार्यालयाचे अध्यपद भूषवण्याची संधी मिळाली होती. कोरोना व्हायरस महामारीदरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांनी स्थानिक नागरिकांना मोठी मदत केल्याची चर्चा त्यांच्या निधनानंतर सुरु होती. (हेही वाचा, NCP Corporator Datta Sane Passes Away: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन)

दरम्यान, शहरात डेंग्युचे प्रमाण वाढते आहे. प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. डेंग्यू हा आजार प्रामुख्याने डासांपासून होतो. त्यामुळे डासांची पैदास नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा ती होऊच नये यासाठी आवश्यक उपाययोजना महापालिका करत असते. परंतू, या उपाययोजना राबवताना पालिका नेहमीच निष्काळजीपणा करते, असा आरोपही स्थानिक नागरिक करताना दिसतात. केवळ डेंग्युसारख्या आजारामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. महापालिका प्रशासनाने याचा त्वरीत विचार करुन आवश्यक उपाययोजना राबबाव्यात अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.