
मुंबईच्या लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train) प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या उद्देशाने, रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान घडलेल्या भीषण अपघातानंतर, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) लोकल ट्रेनच्या दरवाज्याजवळ बॅग घेऊन उभे राहण्यास सक्त मनाई केली आहे. या अपघातात 8 प्रवासी गाडीतून खाली पडले, त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेने मुंबईच्या लोकल ट्रेनमधील गर्दी आणि सुरक्षेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हा अपघात सकाळी 9:30 च्या सुमारास घडला. यावेळी कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत अशा दोन जलद गाड्या एकमेकांजवळून गेल्या. या दोन्ही गाड्या प्रवाशांनी खचाखच भरलेल्या होत्या, आणि फूटबोर्डवर उभे असलेल्या प्रवाशांच्या बॅग एकमेकांना धडकल्या आणि धक्का बसल्याने प्रवासी खाली पडले. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला.
या दुर्घटनेनंतर रेल्वे बोर्डाने तात्काळ पावले उचलली. नव्या निर्णयानुसार, मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी तयार होणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जातील. याशिवाय, सध्या चालू असलेल्या गाड्यांमध्येही जानेवारी 2026 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. स्वयंचलित दरवाज्यांमुळे फूटबोर्डवर उभे राहणे आणि दरवाज्यत गर्दी करणे यासारख्या धोक्यांना आळा बसेल. तसेच, गाड्यांमध्ये हवेशीरपणा वाढवण्यासाठी छतावर व्हेंटिलेशन युनिट्स आणि प्रवाशांना एका डब्यापासून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी व्हेस्टिब्यूल्स सुविधा देण्याचाही विचार आहे.
यासह रेल्वे अधिकाऱ्यांनी फूटबोर्डवरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांच्या वर्तनाचे नियमन करण्यासाठी विविध सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे प्रवाशांना यापुढे रेल्वेच्या दारावर बॅगा घेऊन उभे राहण्याची परवानगी राहणार नाही, विशेषतः गर्दीच्या वेळी. नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त आरपीएफ किंवा स्थानिक पोलीस कर्मचारी तैनात केले जातील.
कल्याण-कसारापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा आणि कुर्लापर्यंत पाचव्या आणि सहाव्या ट्रॅकचा विस्तार जलद गतीने केला जात आहे. ठाणे आणि सीएसएमटी दरम्यानच्या सहाव्या मार्गाचे अपग्रेडेशन लवकरच केले जाणार आहे, जेणेकरून सध्याच्या मार्गावरील गर्दी कमी होईल. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने राज्य सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयांना कार्यालयीन वेळापत्रकांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्याचा विचार करण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Line-9: मिरा-भाईंदर परिसरात मेट्रो लाईन-9 साठी एमएमआरडीएने यशस्वीपणे बसवला 65 मीटर स्टील गर्डर)
दरम्यान, मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची जीवनरेखा आहे, पण तीच आता प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे. रेल्वे प्रशासनाचा हा नवा निर्णय आणि बॅग घेऊन दरवाज्याजवळ उभे राहण्यास बंदी हा सुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र, गर्दी कमी करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवणे आणि रेल्वे मार्गावरील तांत्रिक सुधारणा करणे यासारख्या दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. प्रवाशांनीही सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे.