Raj Thackeray Gudi Padwa Melava Shivaji Park: 'राज ठाकरे जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री'; मुंबईतील सभेपूर्वी 'मनसे'कडून बॅनरबाजी
Raj Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) यांची जाहीर सभा आज मुंबई येथील शिवाजी पार्क ( Raj Thackeray Shivaji Park Sabha) परिसरात पार पडणार आहे. गुढी पाडव्यानिमित्त मनसे (MNS Gudi Padwa Melava ) द्वारा आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, सभेपूर्वीच मनसेने जोरदार बॅनरबाजी केली आहे. खास करुन शिवसेना भवन कार्यालयासमोर मनसेने बॅनर झळकावले आहे. या बॅनरवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असा उल्लेख करण्या आला आहे. थेट शिवसेना भवनासमोरच बॅनर लावल्याने मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्या आजच्या सभेचे मनसेकडून जोरदार ब्रँडींग करण्यात आले आहे. सोशल मीडियावर टीझर आणि पोस्टर्स लॉन्च करण्यात आली आहेत. पाठिमागील काही काळापासून राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यावर राज ठाकरे यांनी विशेष भाष्य केले नव्हते. राज ठाकरे यांनी मधल्या काळात एक मुलाखतही दिली. मात्र, त्याही वेळी त्यांनी आपण सध्या काहीच बोलणार नाही. जे काही बोलाचे ते गुढीपाडव्याला शिवाजी पार्क मैदानातून बोलेन असे म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्याकडूनही आजच्या सभेची उत्सुकता वाढविण्यात आली होती. विशेष म्हणजे 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमातही राज ठाकरे विशेष काहीच बोलले नव्हते. मी टीजर, पोष्टर काहीच लॉन्च करणार नाही. जे काही बोलायचे आहे ते थेट शिवाजी पार्क येथूनच बोलेन असे राज ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut Statement: मनसे पक्ष वाटण्याइतका मोठा नाही, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका)

राज ठाकरे शिवाजी पार्क सभेचा टिझर

राज ठाकरे यांनी या आधी अनेक भूमिका घेतल्या आहेत. अलिकडील काळात मशिंदीवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही सर्वात चर्चेत आली होती. या भूमिकेवरुनही राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका झाली होती. शिवाय शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड झाले. शिवसेना हे नाव आणि चिन्हही एकनाथ शिंदे गटाला बहाल करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना जोरदार झटका बसला. या पार्श्वभूमीवर राज्यात झालेले सत्तांतर, पक्षीय राजकारण, राजकारणाची पातळी, विविध नेत्यांची वक्तव्ये, राज्याचा विकास आणि संस्कृती यावर राज ठाकरे काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.