Water Resource Minister and NCP Leader Jayant Patil | (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोना विषाणूने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनोबाधीत रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे संकट असताना राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर राष्ट्रवादी नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूमुळे राज्य सरकारच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्याला केंद्राची मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे पत्र लिहिले त्याला अजून उत्तर आलेले नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान सहाय्यक निधीला मदत करायची असे धोरण म्हणजे भाजपची कोत्या मनाची प्रवृत्ती आहे. देश कोरोना व्हायरसच्या संकटात असताना राजकारण करण्यात भाजप मश्गुल आहे, अशीही टीका जयंत पाटील यांनी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजूरी दिलेली नाही. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यपालांचा अनादर होईल, असे काही बोलणार नाही. राज्यपाल जे निर्णय घेतील, त्यावर भाष्य करणे योग्य नाही. राज्य सरकारने शिफारस केल्यावर त्यावर लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. कायद्याच्या चौकटी बाहेर कोणी जाणार नाही. कॅबिनेटने प्रस्ताव दिला आहे, त्यावर राज्यपाल निर्णय घेतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.अजूनही काही जणांना आशा आहे की, मी पुन्हा येईन. पण आम्ही त्यावर बोलणार नाही. लोकांच्या लक्षात यायला लागले आहे की, भाजपला सत्ता महत्वाची आहे. कुणाला काहीही स्वप्न पडली तरी महाविकास आघाडीचे सरकार 15 वर्ष चालेल, असे बोलून जयंत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. हे देखील वाचा- नागपूर: Coronavirus Lockdown दरम्यान नागरिकांमध्ये जागतिक आरोग्य संकटाबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिसांनी उभारला कोरोनाचा प्रतिकात्मक पुतळा

भारतात आतापर्यंत एकूण 15 हजार 712 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 हजार 231 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 3 हजार 648 वर पोहचली आहे. यापैंकी 211 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 365 जण कोरोनामुक्त झाले आहेत.