शिवसेनेचा वचननामा फडफडणारा कागद नव्हे तर, महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य: उद्धव ठाकरे
Shiv Sena chief Uddhav Thackeray Appreciated Shiv Sena Manifesto | (Photo credit: Archived, edited, representative images)

Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेनेचा वचननामा हा फक्त फडफडणारा कागद नव्हे तर महाराष्ट्र कल्याणाचे शिवधनुष्य आहे. हे शिवधनुष्ट पेलण्याची ताकद आमच्या मनगटात आहे. महाराष्ट्राला परमवैभवाच्या शिखरावर नेण्याचा 'संकल्प', तो पूर्ण करण्याचा 'निर्धार' आणि त्यासाठी लागणारी हिंमत म्हणजेच शिवसेनेचा वचननामा (Shiv Sena Manifesto), असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या वचननाम्याचे कौतुक केले आहे.

शिवसेना पक्षाचे मखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात उद्धव ठाकरे यांनी हे कौतुकोद्गार काढले आहेत. हे कौतुकोद्गार काढताना इतिहाशाशी इमान राखत नवा महाराष्ट्र घडविण्याची शपथ म्हणजेच शिवसेनेचा वचननामा. त्याची पूर्तता करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्याची 'हीच ती वेळ आहे'', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेआहे.

दरम्यान, निवडणुक आली की, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे पीक तरारुन येते. आताही महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व पक्षांच्या जाहीरनाम्यांचे कागद फडफडत आहेत. त्यांचे नेते प्रचारांतून सभांतून हे कागद जनतेसमोर फडकवीत आहेत. या कागदांवर त्याच त्या आश्वासनांची बाराखडी गिरविण्यात आली आहे, अशी टीका करतानाच जाहीरनाम्यांचा असा धुरळा उडालेला असताना शिवसेनेनेदेखील आपल्या वचननाम्याचा 'भगवा' एका दिमाखात फडकवला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक2019: नितेश राणे यांची शिवसेना विरूद्ध भूमिका नरमली; आदित्य ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची व्यक्त केली इच्छा)

दरम्यान, शिवसेनेने प्रसिद्ध केलेल्या आपल्या वचननाम्यात घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे. यात दहा रुपयांत जेवन, एक रुपयांत आरोग्य तपासणी यांसह शेती, पर्यावरण, उद्योग, व्यवसाय, शालेय शिक्षण यांसह अनेक विषयांवर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेने अनेक घोषणा केल्या आहेत. परंतू, या घोषणांच्या पूर्ततेसाठी लागणारा निधी कसा उपलब्ध करणार याबाबत मात्र या पक्षाने कोणतेच भाष्य केले नाही. दरम्यान, हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी दिलेल्या अश्वासनांची पूर्तता करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करुनच ही अश्वासने दिल्याचे पक्षप्रमुखांनी म्हटले आहे.