Lockdown In India: लॉकडाऊनबाबत नागरिकांमध्ये गैरसमज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषनेनंतर जीवनाश्यक साहित्याच्या खरेदीसाठी लोकांची तुफान गर्दी
human migration in india | ( Credit:- PTI)

भारतात कोरोना आजाराचा (Coronavirus) उद्रेक झाला आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाउनमध्ये (Lockdown) गेली आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naredra Modi), यांनी देशातील नागरिकांशी संवाद करणार असल्याचे ट्विट करून सांगितले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी कोणती मोठी घोषणा करणार यावरून चर्चा सुरू होती. अखरे पंतप्रधान मोदी यांनी कोरोना व्हायरसच प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करत असल्याची मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर नागरिकांनी अत्यावश्यक साहित्यांच्या खरेदीसाठी दुकानाबाहेर गर्दी केली आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. यामुळे नागरिकांनी राशन दुकान, मेडिकल, एटीएम मशीन अधिक गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढता धोका बघून संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. त्याबरोबरच नागरिकांनी घराबाहेर पडू नये व घरात राहून स्वत;बरोबरच कुटुंबही सुरक्षित ठेवावे असे देशवासियांना आवाहन केले. मात्र 21 दिवस सगळच बंद राहणार असल्याचे ऐकून नागरिकांनी पुन्हा धावाधाव करण्यास सुरुवात केली आहे. किराणा सामानाचे दुकान , मेडिकल, पेट्रॉल पंप यांच्याबाहेर गर्दी उसळली असून जी गर्दी टाळण्याचे आवाहन मोदींनी केले त्यालाच हरताळ फासल्याचे चित्र मुंबईत अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. दरम्यान, ही गर्दी कमी करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाची झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तसेच उद्या गुढीपाढवा असल्याच्या निमित्ताने नागरिक फुलांच्या दुकानात गर्दी केल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी

अत्यावश्यक सेवांची सुविधा देण्यासाठी कुर्ला, सायन, घाटकोपर येथील बाजारपेठेत दुकाने सुरू आहेत. या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे, नागरिकांनी मेडिकल, किराणा मालाचे दुकान आणि एटीएम मशीन समोर रांगा लावल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती. याशिवाय भायखळा, माझगाव, धारावी, चेंबूर, सांताक्रुझ, साकीनाका, अंधेरी, मरोळ, पवई परिसरातही नागरिकांचा मोठा जमाव पाहायला मिळाला.