Latur Earthquake: लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात सकाळपासून तीन भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

लातूर जिल्ह्यातील हासोरी भागात सौम्य भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले आहेत. किल्लारी भूकंपाच्या घटनेला कालच तीस वर्षे पूर्ण झाली. आज हासोरी भागात सकाळी सौम्य धक्का बसल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. आज सकाळी 6.29 वाजता जमिनीतून गूढ आवाज होऊन भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्याने घरावरील पत्रे चांगलेच थरथरत होते. या धक्क्याची 2.8 रिस्टर स्केल इतकी तीव्रता नोंद झाली आहे. हा सौम्य स्वरूपाचा धक्का होता. विशेष म्हणजे सकाळच्या धक्क्यानंतर पुन्हा काही तासांनी म्हणजेच 10.30 ते 10.45 दरम्यान पुन्हा दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. (हेही वाचा - Mumbai Shocker: महिलेचा पतीवर मारहाण, घरातील सर्व कामे करायला लावल्याचा आरोप; मुंबई पोलिसांचे प्रत्युत्तर)

गेल्या वर्षी याच दिवसात हासोरी आणि परिसरात भूकंपाचे अनेक धक्के बसले होते. पुन्हा या वर्षी भूकंपाचे धक्के बसत असल्याने काहीतरी मोठा अनर्थ होऊन भयंकर घटना घडेल अशी भीती येथील नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे. किल्लारी येथे झालेल्या भूकंपाला नुकतेच 30 वर्ष पूर्ण झाले आहे.

हासोरी भागात आज पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. कारण गेल्यावर्षी 16 सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर या काळात परिसरात एकूण नऊ धक्के बसले होते. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले होते. सलग दोन महिने गावातील लोकांमध्ये या घटनेची भीती पाहायला मिळाली होती