महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न भारी पडेल-राज ठाकरे, पाहूया मागोठाणे आणि मालामधील सभेचे काही महत्त्वाचे मुद्दे
RajThackeray (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचाराच्या अखेरच्या रविवारीही मुंबईत प्रचाराचा सपाटा लावला. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दहिसरमधील मागाठाणे आणि मालाडमध्ये प्रचारसभा घेतल्या. सरकारवर आगपाखड करत आपल्या पक्षाने केलेल्या कार्यक्रमाचाही पाढा वाचला. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न भारी पडेल असा इशारा ही राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला. तसेच 'मी कोणतंही आंदोलन अर्धवट सोडलेलं नाही. रेल्वे भरतीसाठी आंदोलन केलं, रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाले हटवले, पोलिसांसाठी रस्त्यावर उतरलो, मराठी सिनेमे, मराठी माणसांसाठी आंदोलने केली. मनसेने ही आंदोलनं केली,' असं राज म्हणाले.

राज ठाकरे यांची आजची मागोठाणे आणि मालाडमधील सभा अगदी दणक्यात झाल्या. या सभांमधील पाहूया काही महत्वाचे मुद्दे:

1. पीएमसी बँकेवर भाजपची लोकं, सीटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर शिवसेनेची लोकं आहेत. वाट्टेल तसा कारभार सुरू आहे. यावर कोणाचं नियंत्रण नाही?

2. देश चालवता येत नाही, म्हणून मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 1 लाख 70 हजार कोटी घेतले. हे तुमचे पैसे आहेत. मोदी सरकारने नोटबंदी केली, त्यानंतर 10 दिवसांत मी बोललो होतो की निर्णय चुकला, तर देश खड्ड्यात जाईल. आज 3 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत.

3. तुमच्या हातात बहुमत असताना उद्योगधंदे बंद का पडत आहेत? पारले जी कंपनीनं सांगितलं 10 हजार लोकं आम्ही काढून टाकणार. प्रत्येकाच्या घरी 4 लोकं म्हटलं, तर त्या 40 हजार लोकांनी करायचं काय?

4. आरेमधली झाडं कापल्यावर शिवसेनेचे प्रमुख म्हणतात, 'सत्ता आल्यावर आम्ही तिथे जंगल म्हणून घोषित करू. नंतर काय गवत लावणार का तिथे?' शिवसेनेच्या यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये आरेबद्दल काहीही उल्लेख नाही.

5. शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करून काही होणार नाही. शिवछत्रपतींचं खरं स्मारक कुठलं असेल, तर ते त्यांचे गडकिल्ले आहेत. ते वाचवायला हवेत. त्या किल्ल्यांचं संवर्धन व्हायला हवं. पण त्याच्यावरच खेळ सुरू आहे. समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं? हे कुणीही विचारणार नाही.

हेदेखील वाचा- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: 30% कर्मचा-यांना नारळ देण्याचा राज्य सरकारचा घाट; मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा भिवंडी सभेत घणाघाती आरोप

6. यवतमाळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला जिल्हा. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखू असं सांगून सत्तेत येणाऱ्या सरकारच्या काळात गेल्या 5 वर्षांत 14 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आज मुख्यमंत्र्यांची सभा असताना भाजपचा टीशर्ट घालून एका 35 वर्षांच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली.

7. भाजपचा आमदार मनसेत असताना राम होता, आता रावण झाला

8. 10 रुपयांत थाळी नको, आधी महाराष्ट्र नीट करा

9. आम्ही हातात घेतलेलं कोणतंही काम अर्धवट सोडलेले नाही

10. माझी तळमळ समजून घ्या, सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मत द्या

थोडक्यात आजच्या दहिसर आणि मालाडमधील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दणक्यात पार पडल्या असून या सभांचा मतदारांवर काय परिणाम होतो हे येत्या 24 ऑक्टोबरला कळेलच.