Raj Thackeray | X

महाराष्ट्रात नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा नवा नियम सरकार कडून लागू करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी सोबत आता हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असताना राज ठाकरेंनी आज पुन्हा या महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदीकरणाच्या सरकारच्या भूमिकेचा कडाडून विरोध केला आहे. सरकार ने आजच्या नव्या जीआर मध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती मागे घेतली असली तरीही तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणं अनिवार्य असल्याचं म्हटल्यानंतर आता राज्यात पुन्हा वातावरण तापणार असल्याचं चिन्हं आहे. नक्की वाचा:  Hindi Language Row in Maharashtra: पहिली पासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे; मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून शिकवणं बंधनकारक .

राज ठाकरे यांचं शाळांना अल्टिमेटम

राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आता आपण शाळांच्या मुख्यध्यापकांना पत्र पाठवणार आहोत. कोणती शाळा मुलांना हिंदी शिकवते आहे? हे मला पहायचं आहे असं ते म्हणाले आहेत. भाषा म्हणून हिंदी चांगलीच आहे पण ज्यांना जेव्हा ती गरज असेल तेव्हा ती शिकली जाईल त्यासाठी पहिलीपासून हिंदी शिकण्याची गरज नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पहिलीच्या वर्गातील मुलांवर तीन भाषांचं ओझं नको असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठी साठी एकत्र येण्याचं आवाहन

राज ठाकरे यांनी हा विषय केवळ राजकारणाचा नाही तर मराठी अस्मितेचा झाला आहे. आता हिंदी लादण्याला विरोध केला नाही तर जवळच्या काळात महाराष्ट्रातून मराठी हद्दपार व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातील या हिंदीकरणाला समाजातील सार्‍याच स्तरातून विरोध व्हायला हवा. कलाकार, साहित्यिक, लेखक, संपादक यांनी सरकारला जाब विचारावा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान शाळांमध्ये हिंदी शिकवली जाणार नाही आणि पुस्तक वाटप होणार नाही याची जबाबदारी मनसेचे कार्यकर्ते घेतील असं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी आज शाळांना दिलेल्या अल्टिमेटम साठी कोणतीही टाईमलाईन देण्यात आलेली नाही.