Cyclone Tauktae: रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळाचे थैमान! भिंत कोसळल्याने 2 महिलांचा मृत्यू
Cyclone Tauktae (Photo Credits-ANI)

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळ (Cyclone Tauktae) गुजरातकडे मार्गक्रमण करत आहे. हे वादळ मंगळवारी गुजरात किनारपट्टीवर धडक देणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तौक्ते चक्रवादाळामुळे महाराष्ट्रातही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरे आणि झाडांची पडझड झाली आहे. यातच राजगड (Raigad) जिल्ह्यात भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यात एका महिलेचा जागीच ठार झाली आहे. तर, दुसऱ्या महिलेने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नीता नाईक आणि सुंनदा घरत असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत. या दोन्ही महिला उरण परिसरात भाज्यांची विक्री करतात. परंतु, आज भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या असताना त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. ज्यात नीता नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. तर, सुनंदा घरत गंभीर जखमी झाल्या होत्या. सुनंदा यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घेटनेत एका प्राण्याच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे देखील वाचा-Cyclone Tauktae Effect: देवगड तालुक्यात दोन बोटी गेल्या वाहून; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 7 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. याशिवाय, जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध मार्गावर झाडांची पडझड सुरू आहे. तसेच नागरिकांनी घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

महत्वाचे म्हणजे, अरबी समुद्रात गेल्या 4 वर्षांमध्ये वादळे निर्माण झाले आहेत. तौक्ते हे चौथे चक्रीवादळ आहे. विशेष म्हणजे, एप्रिल ते जून म्हणजेच प्री मान्सून कालावधीमध्ये ही वादळ तयार होत असल्याचे दिसून आले आहे. 2018 पासून या कालावधीमध्ये निर्माण झालेली वादळ ही सिव्हियर म्हणजेच धोकादायक किंवा त्याहून वरच्या प्रकारची अधिक घातक वादळ ठरली आहेत.