Coronavirus: शाहीन बाग आंदोलन, दिल्ली दंगल याप्रमाणेच निजामुद्दीन दर्गा मरकज येथील झुंडी केंद्र सरकारला दिसल्या नाहीत काय? शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल
Shiv Sena MP Sanjay Raut |(Photo Credits: ANI)

राजधानी दिल्ली (Delhi) येथील निजामुद्दीन दर्गा मरकज (Nizamuddin Markaz) प्रकरणामुळे देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढण्याची चिंता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे. देशात लॉकडाऊन असताना एखाद्या कार्यक्रमासाठी त्यातही राजधानीच्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जमूच कसे शकतात? असे विचारतानाच शाहीन बाग आंदोलन, दिल्ली दंगल याप्रमाणेच निजामुद्दीन दर्गा मरकज येथील झुंडी केंद्र सरकारला दिसल्या नाहीत काय? असा थेट टोला राऊत यांनी लगावला आहे.

संजय राऊत हे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते. या वेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुळात दिल्ली हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. इथे दोन सरकारं काम करतात. एक अरविंद केजरीवाल यांचे राज्य सरकार आणि दुसरे केंद्र सरकार. त्यामुळे निजामुद्दीन दर्गा मरकज येथील या कार्यक्रमास नेमकी कोणी मान्यता दिली हे पाहवे लागेल. मगच या संबंध प्रकरणाला कोण जबाबदार हे ठरवता येईल. त्यातही या कार्यक्रमास पोलिसांची मान्यता होती काय? हेही पाहावे लागेल. कारण अवघे जग लॉकडाऊन झाले असताना. देशही लॉकडाऊन असताना एखाद्या कार्यक्रमासाठी लोकांच्या इतक्या झुंडी येतात हे कोणालाच कसे दिसले नाही? की शाहीन बाग आंदोलन, दिल्ली दंगल याप्रमाणेच निजामुद्दीन दर्गा मरकज येथील झुंडी केंद्र सरकारला दिसल्या नाहीत काय? असा सवाल सजय राऊत यांनी विचारला आहे. (हेही वाचा, Coronavirus: 'हा मूर्खपणाच नव्हे तर मस्तवालपणाही!' मरकज प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका)

केवळ काही लोकांच्या अडमुठेपणामुले देशातील जनतेला भोगावा लागू शकतो. राज्यातील कोरोना व्हायरस संकट स्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राज्य सरकार ही जबाबदारी पार पाडत असताना आता त्यांनी कोण कोठून आला हेच पाहात बसायचे काय? त्यांना इतर काही काम नाही काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

संपूर्ण देश लॉकडाऊन असताना इतक्या मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमासठी हजेरी लावणे हा केवळ मूर्खपणाच नव्हे तर मस्तवालपणाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची गर्दी जमवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. मात्र, देश आणि राज्यावर संकट आले असता सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असेही संजय राऊत यांनी या वेळी म्हटले.