Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी व दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी - पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan (Photo Credits: Facebook)

Coronavirus: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टाळी, थाळी व दिवाळी हा त्रिसुत्री कार्यक्रम दुर्दैवी असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Prithviraj Chavan) यांनी म्हटलं आहे. जगातील इतर नेते, राष्ट्राध्यक्ष व शासन प्रमुख, हे स्वत: दररोज पत्रकार परिषदा घेऊन जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देतात. परंतु, मोदींनी मात्र एवढ्या गंभीर संकटातदेखील एकही पत्रकार परिषद घेतली नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. त्यामुळे चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल,’ असं म्हटलं होतं. परंतु, मोदींच्या या आवाहानावर पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. (हेही वाचा - अमरावतीमध्ये 2 एप्रिल रोजी मृत्यू झालेला 45 वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह; जिल्हाधिकारी शैलेश नवल यांची माहिती)

मागील 15 दिवसाच्या कालावधीत प्रधानमंत्री मोदी यांचे हे तिसरे भाषण असून प्रत्येकवेळी कोरोना विषाणूच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. त्यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले, अस म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.