मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shind) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाच्या शपथा घेतल्या खरे. त्यांच्या रुपात राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मिळाले. मात्र, सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार मात्र अद्याप झाला नाही. सुरुवातीला उत्सुकता असलेला हा मंत्रिमंडळ विस्तार हा विषय आता चर्चेचा आणि टीकेचा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे आणि फडणवीस हे दोन्ही नेते मात्र आळिपाळीने दिल्ली दौरा करत आहेत. आता तर या दोघांनी दोन दिवसांचा एक संयुक्त दिल्ली दोरा काढला आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात तरी मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीश्वरांसोबत सकारात्मक चर्चा होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते 'आझादी का अमृत महोत्सव' निमित्त आयोजित बैठकीला दोन्ही नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकिच्या निमित्ताने जरी ते दिल्लीत असले तरीही राज्यातील राजकीय स्थितीवर मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीश्वरांशी चर्चा होईल अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. राजकीय वर्तुळात आता या दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याची खिल्लीही उडवली जाऊ लागली आहे. राजकीय पर्यटन असाही उल्लेख सततच्या दिल्ली दौऱ्यांचा होऊ लागला आहे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या शिवसेना पक्ष चिन्ह बाबत तातडीने निर्णय न देण्याच्या निवडणूक आयोगाला सूचना तर विस्तारीत खंडपीठाबाबतचा निर्णय 8 ऑगस्टला!)
एका बाजूला दोन्ही नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. तर दुसऱ्या बाजूला महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त नाही. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे रखडली आहेत. राज्यात दुसऱ्यांदा पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आतातरी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनही होऊ घातले आहे. विधिमंडळ अधिवेशनाची आगोदर जाहीर झालेली तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. अद्याप नवी तारीख जाहीर झाली नाही. ती लवकरच जाहीर करावी लागणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करणे अनिवार्य होऊन बसले आहे. अशात एका बाजूला न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारवर प्रचंड टीकास्त्र सोडले जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि भाजप या दोघांबद्दलही जनतेच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे दिल्ली दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करणार का? याबाबत उत्सुकता आहे.