मध्य रेल्वे खोळंबली, कल्याण-सीएसएमटी 15-20 मिनिटं उशिरा, देवगिरी एक्स्प्रेस दीड तास टिटवाळा स्थानकात!
कल्याणकडून - सीएसएमटीकडे (Kalyan - CSMT) येणार्या गाड्या 15-20 मिनिटं उशिरानं धावत आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशीच मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 7 -7.15 पासून कल्याणकडून - सीएसएमटीकडे (Kalyan - CSMT) येणार्या गाड्या 15-20 मिनिटं उशिरानं धावत आहेत. यामुळे ऐन कामाच्या वेळी चाकरमान्यांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्यामागील कारण अद्यापही अस्पष्ट आहे. रेल्वे उशिराने धावत असल्याच्या घोषणा रेल्वे स्थानकात केली जात आहे.
देवगिरी एक्सप्रेस टिटवाळा स्टेशनमध्ये दीड तास थांबली आहे. सकाळी 8.30नंतर या गाडीचा मार्ग करण्यात आला. त्यामुळे मुंबई लोकलच्या सोबतीनेच मध्य रेल्वेमार्गावर धावणार्या लांब पल्ल्याचा गाड्यांनाही उशिर होत आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम जनजीवनासह वाहतूकीवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
अनेक चाकरमनी नोकरी-धंद्याच्या निमित्ताने नियमित मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. अशातच सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडल्यास मोठ्या प्रमाणात स्टेशन आणि रेल्वेमध्येही गर्दी होते. परिणामी गोंधळाची स्थिती असते.
(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2019 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

