'अग्रलेखाची भाषा अशी असते का?' आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला टोला
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलने देखील होत आहेत. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. पडळकरांचे शब्द चुकले, पण शरद पवार यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेले चालते का? अशी विचारणा करताना ही महाष्ट्राची संस्कृती नाही असे, चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसेच तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे? असा टोलाही शिवसेनावर लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांची नुकतीच कोल्हापूर येथे पत्रकार परिषद पार पडली आहे. दरम्यान, त्यांनी पडळकर यांची बाजू मांडली आहे. तसेच पत्रकारांशी बोलताना त्यांनी विरोधकांनाही खडेबोल सुनावले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतो. आम्हाला कसलीही टोपण नाव ठेवली जातात. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामे जरूर केली. परंतु, तुम्ही अग्रलेखामध्ये काय लिहिता? त्यातली तुमची भाषा कसली आहे? असे म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. हे देखील वाचा- गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; शरद पवार यांच्याबद्द वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण

गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असे माझे मत आहे. ते गेल्या अनेक महाराष्ट्रचे नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. यापुढेही ते चालूच ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे अशी त्यांची भूमिका आहे, असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत, असे वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 1 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले होते. परंतू, सरकार गेल्याने त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र, या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसेच घरांसंबंधी निर्णय आहेत. विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु, असेही ते म्हणाले होते.

पडळकरांच्या टीकेनंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केल आहे. शरद पवार हे आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र, ते आमचे शत्रू नाहीत. त्यामुळे असे शब्द वापरणे चुकीचे आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत.