चंद्रपूर मधील दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; जयंत पाटील यांचा जूना व्हिडिओ शेअर करत विचारला जाब
Chitra Wagh | (Photo Credits: Facebook)

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दोन दिवसांपूर्वी घेतला. त्यावरुन विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देखील ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत जाब विचारला आहे.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल, यवतमाळ मध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन जयंत पाटील देत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहिलं काम आम्ही करू. चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये का होत नाही, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडिओमध्ये उपस्थित केला आहे. यावरुन चित्रा वाघ यांनी 'क्या हुआ तेरा वाद जयंतरावजी' असा सवाल केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्या लिहिलात, "क्या हुवा तेरा वादा...जयंतराव जी. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार... इस आश्वासन का... यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल."

चित्रा वाघ ट्विट:

यापूर्वी देखील 'भगिनींनो संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या रहा परत चार हात करायची वेळ आणली' या सरकारने आपल्यावर असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

दरम्यान, चंद्रपूरात 2015 पासून दारुबंदी होती. मात्र या निर्णयामुळे  जिल्ह्यातील अवैध दारु विक्री, सेवन आणि त्यासंबंधित गुन्हेगारीत वाढ झाल्याने दारुबंदी उठवण्यात आल्याचे सरकारने सांगितले. दारुबंदी उठवण्यावर अनेक सामाजिक संघटांनी विरोध दर्शवला होता. यासाठी तब्बल 30 हजार निवेदनं सरकारकडे आली होती.