Chandrakant Patil and Sharad Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधापक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, शरद पवार यांनी या वयातही कोकणात जाऊन 2 दिवसांचा मुक्काम केला आहे. त्यांच्या कामाचा वेग प्रचंड आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्या कामगिरीची कौतूक केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर राजकारण आणखी काही बदल पाहायला मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हा राष्ट्रवादीशी सलगी करण्याचा तर प्रयत्न नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहेत. महाविकास आघाडी आणि भाजप नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दिवसांपूर्वी कोकण दौऱ्यावरुन शरद पवारांवर आरोप केले होते. मात्र, आज पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांचे तोंडभरून कौतुक केले आहे. दरम्यान ते म्हणाले की, शरद पवार यांच्या कामाचा वेग भयंकर असून ते देशाने पाहिले आहे. आम्ही त्यांचा आदर ठेऊनच टीका करतो. या वयात कोकणात जाऊन त्यांनी 2 दिवसांचा मुक्काम केला. या वयातही ते तब्येतीची काळजी न करता समस्येला झडप मारतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. परंतु, कशावर अवलंबून त्यांनी हे विधान केले आहे? तसेच राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा नवे वळण पाहायला मिळणार का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. मात्र, याचे उत्तर येत्या काही काळानंतर सर्वांनाच कळणार आहे. हे देखील वाचा- उद्धव ठाकरे यांचे सासरे, रश्मी ठाकरे यांचे वडील माधव पाटणकर यांच्या निधनानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित पवार यांनी पत्रातून वाहिली श्रद्धांजली

\दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. कोकणात अजित पवार, जयंत पाटील गेले नाहीत. मुख्यमंत्री केवळ एक ते दीड तासासाठी कोकणात गेले होते, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच चक्रीवादळाने शेतकरी, मच्छिमाराचा मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रति झाडाला किमान पाच वर्षाच्या उत्पन्नानुसार पैसे दिले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.