आदित्य ठाकरे यांचा 'मुंबई नाईट लाईफ' हा उपक्रम ठरला हिट की फेल? जाणून घ्या
Mumbai Night Life (Photo Credits: File Image)

Response To Mumbai Night Life: मुंबईकरांना नाईट लाईफ उपभोगता यावी यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच ही योजना सुरु करावी असे म्हटले होते. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार, काल, 26 जानेवारीपासूनच मुंबईत हा उपक्रम राबवण्यात आला. ‘नाइट लाइफ’ या उपक्रमांतर्गत मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि दुकाने 24 तास सुरू राहणार अशी घोषणा करण्यात आली होती. तसं असलं तरी पब आणि बारच्या वेळेवर मात्र राज्य सरकारनं पूर्वीप्रमाणेच मर्यादा घातल्या असल्याने मुंबईतील सर्व पब आणि बार रात्री दीडच्या सुमारास बंद करण्यात येणार आहेत. तसं न केल्यास किंवा रात्री दीडनंतर कोणत्याही वाईन शॉप अथवा बारमध्ये मद्यविक्री केल्यास त्या विक्रेत्याचा परवाना 2 वर्षांसाठी रद्द करण्यात येणार असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कालपासून सुरु करण्यात आलेली 'नाईट लाईफ' ही योजना नक्की कितपत यशस्वी ठरली हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तसं बघायला गेलं तर कालपासूनच हा उपक्रम सुरु करण्यात आला असून पहिल्या रात्री मात्र याला तसा अल्प प्रतिसाद मिळाला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मुंबईतील काहीच ठिकाणची हॉटेल्स काल सुरु होती, तर अनेक ठिकाणी फक्त बंद दुकाने आणि हॉटेल्स जास्त पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सरकार कोणत्याही हॉटेल मालकावर किंवा दुकानदारावर 'नाईट लाईफ' ची सक्ती करणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

'नाईट लाईफ' ही कोणाची मागणी नव्हती हा फक्त चिरंजीवांचा हट्ट - नारायण राणे

काल रात्री आदित्य ठाकरे मात्र रात्रीच्यावेळी घराबाहेर पडले व त्यांनी वरळी फेस्टिव्हलला भेट दिली. 'नाईट लाईफ' हा उपक्रम सुरळीत सुरु आहे की नाही याची पाहणी केली. तसेच माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “पूर्वी जीवाची मुंबई व्हायची, आता मात्र जेवायची मुंबई होईल.”