'नाईट लाईफ' ही कोणाची मागणी नव्हती हा फक्त चिरंजीवांचा हट्ट - नारायण राणे
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

नाईट लाईफ (Nightlife) ही कोणाची मागणी नव्हती हा फक्त चिरंजीवांचा हट्ट आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Former Chief Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Udhhav Thackeray) यांच्यावर केली आहे. मुलाचे असे हट्ट पुरवण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी इतर प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु आहेत. मी त्यांच्या तालमीत तयार झालो आहे. मात्र उद्धव ठाकरे हे अनुभव शून्य आहेत. ते मुख्यमंत्री झाल्याने राज्य अधोगतीला जाईल, असं वक्तव्यही नारायण राणे यांनी केलं आहे. ते पुण्यातील सॅटर्डे क्लबमध्ये बोलत होते. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले. यंदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं कधीही वाटलं नव्हतं. परंतु, आता उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा मान ठेवावा, असंही नारायण राणे यावेळी म्हणाले. (वाचा - पोटाला जात-पात, धर्म, अर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा, हेच शिवभोजन योजनेचे उद्दिष्ट- आदित्य ठाकरे)

या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, मोहन जोशी, घटनातज्ज्ञ उल्हास बापट, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह अनेक अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.