Supreme Court of India | (Photo Credits: IANS)

गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधा प्रकल्पाविरुद्धच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुनावणीदरम्यान 'आमची मुंबई' (Aamchi Mumbai) आणि 'त्यांची मुंबई' (Tyanchi Mumbai) या दोन मुद्द्यांवर उल्लेखनीय चर्चा झाली. ज्यामुळे मराठी अभिव्यक्तींभोवती एक सांस्कृतिक चर्चेसाठी वाद पुढे आला. गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टी आणि टर्मिनल सुविधा प्रकल्पाविरुद्ध दाखल करण्यात आलेली याचीका आज (मंगळवार, 27 मे) सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली. या वेळी याचिकेवरील सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश गवई (CJI BR Gavai) यांनी ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ यामधील फरक अगदी मोजक्या शब्दांमध्ये स्पष्ट केला.

'आमची' आणि 'त्यांची' याचा अर्थ काय?

मराठीत ‘आमची’ म्हणजे आपली आणि ‘त्यांची’ म्हणजे दुसऱ्यांची. मात्र मुंबई संदर्भात या शब्दांना केवळ भाषिक नव्हे तर सामाजिक-सांस्कृतिक अर्थ आहे. ‘आमची मुंबई’ ही सामान्य माणसांची, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची मुंबई मानली जाते. तर ‘त्यांची मुंबई’ म्हणजे उच्चभ्रू, श्रीमंत आणि विशेष वर्गासाठी असलेली जागा किंवा परिसर, असा त्याचा अर्थ असतो असे, सरन्यायाधीश बी आर गवई  म्हणाले. (हेही वाचा, सरन्यायाधीशांच्या भेटीदरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, ठोठावला 7,000 रुपयांचा दंड)

मुंबईच्या विभागांवर CJI बीआर गवई यांची प्रतिक्रिया

याचिकेवरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बीआर गवई यांनी निरीक्षण नोंदवत म्हटलं, ‘‘आमची मुंबई’ कुलाब्यात राहत नाही. ‘त्यांची मुंबई’ तिथे असते. ‘आमची मुंबई’ मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये आहे.’ त्यांच्या या विधानामुळे मुंबईतील सामाजिक विषमतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून सामाजिक स्तरांचे प्रतिक देखील असल्याचं अधोरेखित झालं.

गेटवेजवळील जेट्टी प्रकल्पाला रहिवाशांचा विरोध

क्लीन अँड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशन, म्हणजेच कुलाब्यातील 400 पेक्षा अधिक रहिवाशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने ही याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांनी या प्रकल्पावर सार्वजनिक ऐकणूक न घेता आणि कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता काम सुरू असल्याचा आरोप केला.

याचिकाकर्त्यांचे वकील म्हणाले, “हा प्रश्न ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ यामधला आहे – फरक याच ठिकाणी असतो.”

‘‘प्रकल्प हवा, पण माझ्या घरामागे नको’’ – CJI गवई यांची टिप्पणी

मुख्य न्यायाधीश गवई यांनी याचिका फेटाळताना स्पष्ट केलं की शहरात विकास होण्यासाठी विरोध होतोच, पण त्याचे फायदे दूरगामी असतात. “सगळ्यांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र हवं असतं, पण माझ्या घरामागे नको,” असं त्यांनी सांगितलं. तसेच त्यांनी मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पाचे उदाहरण देत म्हटलं, “दक्षिण मुंबईतील व्यक्ती आता वर्सोवा 40 मिनिटांत गाठतो, जे पूर्वी 3 तास लागायचे.”

अशा प्रकल्पांची जगभर उदाहरणं आहेत – सुप्रीम कोर्ट

मुख्य न्यायाधीशांनी हेही नमूद केलं की, अशा किनारपट्टी प्रकल्पांची अंमलबजावणी जगभरात होते. “तुम्ही मियामीला जा, तिथे असे अनेक प्रकल्प आहेत,” असं त्यांनी सांगितलं.

प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण होणार – याचिकाकर्त्यांचे म्हणणे

याचिकाकर्त्यांच्या वतीने सादर केलेल्या माहितीप्रमाणे, हा प्रकल्प फक्त विशिष्ट वर्गासाठी असून, तो कोणतीही लोकसहभाग प्रक्रिया न घेता उभारला जात आहे, असा आरोप करण्यात आला.

दरम्यन, या चर्चेमुळे मुंबईच्या ओळखीवर आणि विकासाच्या प्रक्रियेवर एक वेगळा प्रकाश टाकण्यात आला आहे. आजही ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ या संकल्पनांमध्ये अंतर आहे, आणि तेच अंतर भविष्यातील शहरी नियोजन आणि समावेशी विकासात अधिक स्पष्टपणे समोर येण्याची शक्यता आहे.