Aurangabad: बँक खात्याला आधार लिंक नसल्याने 6 हजार 993 शेतकऱ्यांना मिळाला नाही कर्जमाफी योजनेचा लाभ
Farmer | Photo Credits: PTI

Aurangabad: बँक खात्याला आधार लिंक नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील 6 हजार 993 शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. 2019 मध्ये राज्य सरकारतर्फे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती. मात्र, बँकेच्या खात्याला आधार लिंक नसलेल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.

ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाची घोषणा केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना जोपर्यंत आधार लिंक नाही, तोपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ बँक खात्याला आधार लिंक करावे, असे आवाहन सहकार विभागातर्फे करण्यात येत आहे. (वाचा - नागपूर मध्ये महावितरणा कडून थकीत वीज बील न भरणार्‍यांची 'बत्ती गुल' करण्याला सुरूवात)

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 2 ते 3 टप्प्यात लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली होती. यात केवळ आधार कार्ड बँक खात्याशी प्रमाणिकरण न केल्यामुळे जिल्ह्यातील 6 हजार 993 लाभार्थांना योजनेची लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी लवकरात-लवकर आधार कार्ड प्रमाणिकरण करावे, अशी सूचना बँक अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या दुसऱ्या यादीत जिल्ह्यातील 1 लाख 78 हजार 653 शेतकऱ्यांचा समावेश होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.