महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते आज घडतंय- अजित पवार
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर जोरदार टिका केली आहे. वाशिम येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेक वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कार्यरत असलेले नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. सध्या कोणत्याही कार्यकर्त्याजवळ निष्ठा राहिलेली नाही. तसेच भाजप पक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडण्याचे काम करीत आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्षात कार्यरत असलेल्या नेत्यांना पैशांचा प्रलोभ दाखवला जात आहे. राष्ट्रवादीने कधीच विरोधी पक्षाचा लोकांना फोडण्याचे प्रयत्न कधी केला नाही. हे सगळं संपवायचं असेल तर आघाडीला निवडून दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“जे पक्ष सोडून गेले त्यांना पक्षाने खुप काही दिलं. पूर्वी निष्ठा होती परंतु आता निष्ठेला महत्व राहिलेलं नाही. जाणाऱ्यांना भीती, प्रलोभने दाखवली जात आहे. आम्ही १५ वर्ष सत्तेत होतो. विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. महाराष्ट्रात असं कधी घडलं नव्हतं ते आज घडतंय. तुम्ही पाच वर्षात चांगलं काम केलं असेल तर यात्रा कशासाठी काढता असा सवाल करतानाच हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप पवार यांनी केला. पाच वर्षांत राज्याला या सरकारने कंगाल करुन टाकले आहे. ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. सरकारकडून निव्वळ आश्वासनं दिली जात आहेत. सरकारच्या करंटेपणामुळे बेकारी वाढली आहे. तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले आहे.”