काँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा
Congress President Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गरीबांसाठी विशेष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गरिब कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त श्रीमंतांना मदत करतात. मात्र आम्ही गरीबांना मदत करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

मासिक उत्पन्न 12,000 रुपयांहून कमी असणाऱ्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. यानुसार काँग्रेसच्या या नव्या योजनेचा लाभ भारतातील 20% गरीब कुटुंबाना मिळेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या योजनेचा थेट फायदा 5 कोटी गरिब कुटंबाना आणि 25 कोटी लोकांना नक्कीच मिळेल. यासाठीचा सर्व आराखडा तयार असून अशी योजना जगात कोठेही नसल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

ANI ट्विट:

दररोज गरीबांचे पैसे चोरी होतात, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गरीबांना कसेबसे 3 हजार रुपये मिळतात तर श्रीमंतांना लाखो-करोडो रुपये दिले जातात. पंतप्रधान मोदींनी दोन भारत बनवले आहेत- एक अनिल अंबानींसारखा आणि एक गरीब शेतकऱ्यांसारखा.