Vande Bharat | Twitter

रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा (Mumbai-Jalna Vande Bharat Express) विस्तार नांदेडपर्यंत (Nanded) करण्यास मान्यता दिली आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रातील शीख समुदायाच्या दीर्घकालीन मागणीला यश मिळाले आहे. ही अतिशय वेगवान आणि आधुनिक रेल्वे सेवा नांदेड येथील हजूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या लाखो शीख भाविकांसाठी वरदान ठरणार आहे, जिथे शीख धर्माचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंहजी यांनी आपल्या जीवनाचा अंतिम काळ व्यतीत केला होता. नुकतेच या निर्णयाची घोषणा झाली, आणि ही सेवा लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या विस्तारामुळे नांदेड, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांना मुंबईशी जलद आणि सुखकर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक 20705/20706) आता नांदेडपर्यंत धावणार आहे, ज्यामुळे 434 किलोमीटरच्या मार्गाचे अंतर 540 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. ही रेल्वे नांदेड येथून पहाटे 5:00 वाजता सुटेल आणि दुपारी 2:25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथे पोहोचेल.

परतीच्या प्रवासात, ट्रेन क्रमांक 20706 मुंबईहून दुपारी 1:10 वाजता सुटेल आणि रात्री 10:50 वाजता नांदेडला पोहोचेल. या मार्गावर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक, कल्याण, ठाणे आणि दादर येथे थांबे असतील. ही सेवा आठवड्याचे सहा दिवस (शुक्रवार वगळता) चालेल. रेल्वेची सरासरी गती 59-64 किमी/तास असून, काही भागात ती 130 किमी/तासापर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होईल. (हेही वाचा: Mumbai Metro Line 5 To Extend Till Ambernath: प्रवाशांना दिलासा! मुंबई मेट्रो मार्ग 5 अंबरनाथपर्यंत वाढवण्यात येणार; खासदार Shrikant Shinde यांनी MMRDA अधिकाऱ्यांशी केली चर्चा)

नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब हे शीख धर्मातील पाच तख्तांपैकी एक आहे, जिथे गुरू गोबिंद सिंहजी यांनी 1708 मध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. दरवर्षी लाखो शीख भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात, आणि मुंबईहून नांदेडपर्यंत जलद रेल्वे सेवेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शीख असोसिएशन (MSA) आणि गुरू नानक सेवा संगत यांच्यासह विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी लावून धरली होती. या मागणीला यश मिळाल्याने शीख समुदायात आनंदाचे वातावरण आहे. या विस्तारामुळे नांदेड आणि परभणी येथील रहिवाशांना मुंबईशी थेट आणि जलद संपर्क मिळेल, ज्यामुळे व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनाला चालना मिळेल.