
अलिकडेच झालेल्या मुंब्रा रेल्वे अपघातात (Mumbra Brain Accident) चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. यानंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवरील, विशेषतः ठाण्यापुढील असलेल्या गर्दीबाबत बाबतीत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणचे (Dr Shrikant Shinde) यांनी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यामध्ये तातडीने वाहतूक उपाययोजनांवर भर देत, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लाईन 5 चा उल्हासनगर मार्गे अंबरनाथपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत शिंदे यांनी सोशल मिडियावर माहिती दिली.
ते म्हणाले, एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीत आज एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे, उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यभागी उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यात येणार आहे.
यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मुंबई आणि ठाणे गाठणे सोपे होणार आहे. याबाबत एमएमआरडीएला जलदगतीने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी रेल्वे व मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, प्रवाशांना सहज, जलद आणि सुसंगत प्रवास करता येणार आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीकरणामुळे अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड परिसरात थेट मेट्रो सेवा उपलब्ध होणार असून, बदलापूर-अंबरनाथहून मुंबई-ठाणे प्रवास सुलभ होणार आहे. तर यामुळे लोकल ट्रेनवरील ताण कमी होणार असून वाहतुक जलदगतीने होणार आहे. तसेच वेळ, इंधन आणि पर्यावरण यांची मोठी बचत होणार आहे.
यावेळी शिंदे यांनी कल्याण रिंग रोडच्या विविध टप्यांचे उर्वरित काम वेगाने मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या. त्यांनी पुढे सांगितले की, नेवाळी येथे द्विस्तरीय मार्ग उभारण्यात येणार आहे. यामध्ये एका स्तरावरून उड्डाणपूल आणि त्यावरून मेट्रो मार्गिका जाणार आहे. याची निविदा लवकर काढण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या उभारणीमुळे वाहनचालकांना वाहतूक जलदगतीने करणे शक्य होणार आहे. (हेही वाचा: PTP Traffic Cop App: वाहतूक व्यवस्थापनासाठी पुणे पोलिसांचे नवीन शस्त्र; नियमांचे उल्लंघन झाल्यास 'पीटीपी ट्रॅफिक कॉप ॲप’द्वारे नागरिक करू शकणार तक्रार, जाणून घ्या सविस्तर)
Mumbai Metro Line 5 To Extend Till Ambernath:
एमएमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांच्या मुख्य उपस्थितीत आज एमएमआरडीए मुख्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने उल्हासनगर… pic.twitter.com/5nZCFZiPCf
— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) June 13, 2025
शिळफाटा उड्डाणपूल वेगाने उभारणार असून याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून याचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. या पुलाच्या उभारणीमुळे शिळफाटा येथील वाहतुक अधिक जलदगतीने होईल. कल्याण पूर्वेतील यू टाइप रस्त्याची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबत निविदा काढण्यात येणार आहे. विठ्ठलवाडी वालधुनी पुलाच्या उभारणीला गती देणे, पुणे लिंक रस्ता ते सूचक नाका केडीएमसी या रस्त्याच्या उभारणीचा विकास आराखडा तयार करणे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चक्की नाका ते नेवाळी रस्ता रुंदीकरण करण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.