Atma Nirbhar Bharat Abhiyan अंतर्गत जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण देणार अधिक माहिती; आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद
Finance Minister Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस संकटात देशाला उभारी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची (Atma Nirbhar Bharat Abhiyan) घोषणा केली. यासाठी मोदींनी 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. 20 लाख कोटी या मोठ्या रक्कमेचा वापर कसा करणार याची तपशीलवार माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) गेल्या 3 दिवसांपासून देत आहेत. त्यात त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून आजही नव्या तरतूदींची माहिती देणार आहेत. यासाठी आज पुन्हा एकदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता अर्थमंत्री पत्रकारांशी संवाद साधतील.

कोविड 19 च्या संकटात गरिब आणि व्यावसायिकांना मोठी मदत करण्यासाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले असून  यात शेतकरी, श्रमिक आणि मध्यमवर्गीयांचा देखील विचार करण्यात आला आहे. MSME सेक्टर, पगारदार वर्ग, शेतकरी, श्रमिक यांच्यासाठी आतापर्यंत घोषणा केल्या आहेत. तसंच 'वन नेशन वन' रेशन कार्डची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. तसंच स्थलांतरीत मजूरांना आता रेशनकार्ड शिवाय अन्नधान्य खरेदी करता येणार आहे. विशेष म्हणजे कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ANI Tweet:

कोविड 19 च्या संकटात आत्मनिर्भर अभियान आर्थिक पॅकेजमुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.  आज अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याची देशवासियांना उत्सुकता आहे. दरम्यान देशातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत भारतात 3970 कोरोना बाधित नवे रुग्ण तर 103 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 85940 इतकी झाली असून त्यापैकी 30153 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर 53035 रुग्णांवर अद्याप उपचार सुरु आहेत. देशात कोरोना संसर्गामुळे एकूण 2752 जणांचा बळी गेला आहे.